नोकरभरती बंदीने बेरोजगारांमध्ये नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST2021-01-22T04:26:02+5:302021-01-22T04:26:02+5:30
कोसा उत्पादकांना अनुदानावर शिडी द्यावी चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात ...

नोकरभरती बंदीने बेरोजगारांमध्ये नैराश्य
कोसा उत्पादकांना अनुदानावर शिडी द्यावी
चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात कोसा उत्पादन घेतले जाते. झाडावरून कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे. चिमूर तालुक्यात मोटेगाव, काजळसर, सिंदेवाही-सावली तालुक्यात पेंढरी व पाथरी भागात भोई-ढिवर समाजाचे गरीब कुटुंबे कोसा उत्पादन घेतात.
शेकडो शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा
राजुरा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली; परंतु बोंडअळीने शेतकऱ्यांना लागवडीचाही खर्च मिळाला नाही. आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण केले; पण शेकडो शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
बल्लारपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण आहेत. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला. शहरात अनेक नागरिक श्वानांचे पालन करतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लस देणे सक्तीचे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नाली उपसा न झाल्याने डासांचा उच्छाद
वरोरा : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नाल्याचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिग्नल बंदमुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : शहरातील जनता कॉलेज चौकातील वाहतूक दिवे बंद राहत असल्याने वाहने सुसाट वेगाने दामटली जातात. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. चौकात पोलीस तैनात असतात. मात्र, दुपारी अचानक सिग्नल बंद होत असल्याने अपघाताचा धोका आहे.
वर्दळीच्या चौकात गतिरोधक तयार करा
ब्रह्मपुरी : शहरात दररोज सकाळी वडसा मार्गावरील झांशी राणी चौकात वाहनांची वर्दळ असते. हा अतिशय संवेदनशील चौक असल्याने दररोज किरकोळ अपघात होतच असतात. त्यामुळे बांधकाम विभागाने गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर
गोंडपिपरी : येथील वर्दळीच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते. काहींनी स्वत: अतिक्रमण हटविले. मात्र, अनेकांचे अतिक्रमण जैसे-थे आहे. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नगरपंचायतने ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रिक्त पदांमुळे विकास योजना कागदावरच
सिंदेवाही : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्याही विविध योजना आहेत. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत.