देऊरवाडा तीर्थक्षेत्राचा विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:53+5:302021-02-18T04:52:53+5:30
धूर फवारणी करण्याची मागणी चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. ...

देऊरवाडा तीर्थक्षेत्राचा विकास करावा
धूर फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. महापालिका प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शकचा अभाव
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे मोठी वर्दळ असते.
जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प
चंद्रपूर : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी, ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे.
रस्त्यावरील वीज खांबामुळे धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. महावितरणने जुने खांब बदलवून नवीन लावावे.
ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर
चंद्रपूर : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.
गॅस एजन्सी नसल्याने नागरिक त्रस्त
कोरपना : कोरपना तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. येथे अधिकृत गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोरपना येथे अधिकृत गॅस एजन्सी नसल्याने गॅस कनेक्शनधारकांना ५० किलोमीटर अंतरावरील बल्लारपूरला जावे लागते. येथील एजन्सी आठवड्यातून एकच दिवस सुरू राहत असल्याने नागरिकांना अनेक वेळा वापस जावे लागते.
कोरपना-उमरेड बसची मागणी
चंद्रपूर : कोरपना येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, चिमूर परिसरातील प्रवाशांना सोयोचे होईल. यासंदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला
राजुरा : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ही कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, ती रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला ही कुत्री कळपाने असतात. अनेकवेळा रात्री दुचाकीच्या मागे कुत्री धावतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
विना नंबर प्लेट वाहनाचा वापर वाढला
चंद्रपूर : रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देतात. परंतु अलीकडे चंद्रपूर शहरात विना नंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विना नंबरची अनेक जुनी वाहनेही रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे.
आसोला येथे बसस्थानकाची मागणी
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या आसोला येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे बसस्थानक बनविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आसोला हे गाव भिसी कांपा या राज्य महामार्गावर वसले असून, ६०० लोकवस्तीचे हे गाव आहे. याठिकाणी बसस्थानक होते. परंतु पाच वर्षाआधी आलेल्या वादळाने बसस्थानकाची पूर्णपणे मोडतोड झाली होती. तेव्हापासून हे गाव बसस्थानकविरहित आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे शासनाने बसस्थानक बांधून द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दंतचिकित्सकाची नियुक्ती करावी
गांगलवाडी : दिवसेंदिवस प्रत्येक आजारासोबत दातांचे आजारदेखील वाढत असून, दातदुखीच्या रुग्णसंख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दंत चिकित्सकांची नियुक्ती केली नसल्याने या रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
समारंभातील अन्नाची नासाडी थांबवावी
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अगदी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणारे समारंभ आता कोरोना संकट कमी होत असतानाही पुन्हा जुन्याच पद्धतीनुसार जास्त पाहुणे बोलावून केले जात आहेत. मात्र यामध्ये अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
शासकीय कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
चंद्रपूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी असतात. आपल्या तक्रारी वरिष्ठांसमक्ष जाणार या हेतूने संबंधित विभागाच्या दिशानिर्देशाने बहुतांश शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. संबंधितांची तक्रार करावी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी सवलत
सिंदेवाही : शेतकऱ्यांना नियमित मीटर रीडिंग न होता अनाठायी मिळालेल्या बिलामुळे थकीत कृषी वीज बिलाचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक आहे. थकीत वीज बिलामुळे शेतकऱ्यांना आधुनिक सेवा व सुरळीत वीज मिळणे कठीण झाले आहे. ही सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने सुविधा धोरण राबविण्याचे आखले आहे.
रिक्त पदांमुळे कामे खोळंबली
जिवती : येथील तहसील कार्यालयात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. प्रशिक्षणातूनू शेतकऱ्यांना अद्ययावत शेती करण्यास मदत होईल.
रबी हंगामामुळे गावातील कट्टे थंडावले
चंद्रपूर : सध्या शेतामध्ये रबी हंगाम सुरू आहे. त्यामुळे गावातील पारावर तसेच चौकाचौकात बसून गप्पा करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कट्टे ओस पडल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यातील वरोरा, राजुरा, मूल, सावली तालुक्यात दुबार पीक घेण्यात येते.
अतिवृष्टीचा निधी मिळाला नाही
चंद्रपूर : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या पटवारी आणि तहसील कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. काही दिवसात नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन देऊन अधिकारी मोकळे होत आहेत. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे. यंदा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप
चंद्रपूर : येथील तुळशीनगरात ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देऊन विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सौरदिवे दुरुस्त करावेत
चंद्रपूर : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावात सौर पथदिवे सुरू केले. मात्र, यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहेत. दरम्यान, काही सौरदिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. साैरदिव्यांचा प्रकल्प अपयशी ठरला.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक बेजार
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम भागात असलेल्या गावातील रस्त्यावरून जाणे तर जिकिरीचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर राबवा
चंद्रपूर : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. मात्र नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायाकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन शिबिर राबविण्यात येतात. मात्र ग्रामीण भागात होत नाही.
वळण रस्त्यावर रेडियम लावावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. बांधकाम विभागाने ही समस्या सोडविण्याची मागणी आहे.
नव्या कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी
कोरपना : तालुक्यातील कवठाळा व पार्डी येथे कनिष्ठ महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांना गडचांदूर किंवा कोरपना येथे जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे परिसरात कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ते, नाल्याचे बांधकाम अजूनही अर्धवट
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर, इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्याचे बांधकाम अर्धवट आहे. दरवर्षी पावसाळ्यातील रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे मोठी अडचण जाते.