तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:27 AM2021-04-11T04:27:48+5:302021-04-11T04:27:48+5:30
ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची ...
ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तलावांचे सर्वेक्षण गरजेचे आहे.
माजरी - कोंढा मार्गावर धुळीचे साम्राज्य
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होते. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचून राहतो. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी मागण्याची मागणी केली जात आहे.
दुर्गापुरात अपघाताची शक्यता वाढली
दुर्गापूर : दुर्गापूर - ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर - ताडोबा मार्ग आहे; मात्र या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर सतत वर्दळ असते.
किटाळी येथे बसस्थानकाची मागणी
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या किटाळी मक्ता येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे बसस्थानक बनविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. किटाळी हे गाव चिमूर- कानपा या राज्य महामार्गावर वसले असून, स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.
आदिलाबाद मार्गावर रेडियम पट्ट्या लावाव्या
राजुरा : आदिलाबाद मार्गावर अंतर फलक व झाडावर रेडियमपट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. राज्य सीमेवरील राज्य सीमा फलक सुस्थितीत करून सीमेचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी आहे.
अवैध वाहतूक वाढली
राजुरा : तालुक्यातील वेकोलिच्या औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात सुख-सुविधा उपलब्ध आहेत; मात्र बसअभावी विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतुकीचा अवलंब करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या असलेल्या सोई-सुविधा निकामी ठरल्या आहेत. या संधीचा फायदा घेत अवैध वाहतुकीने डोके वर काढले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नागभिड मार्गावर नियमांचे उल्लंघन
ब्रह्मपुरी : नागभिड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो ऑटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत; मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने ऑटोचालकांची मनमानी वाढली. ब्रह्मपुरी येथून विविध कामांसाठी वडसा येथे जाणाऱ्या नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढली.
व्यायाम शाळा उभारण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कोरपना तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत.
तंटामुक्त समित्यांना आर्थिक बळ द्यावे
नागभिड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते; मात्र या समित्यांमध्ये राजकारण शिरायला नको. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी चांगले कार्य केले. गृह विभागाने समित्यांना आर्थिक बळ द्यावे.
मामा तलावावरील अतिक्रमण हटवा
नागभिड : तालुक्यात ५० पेक्षा जास्त मामा तलाव आहेत; मात्र तलावांच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून तुटपुुंजी तरतूद केली जाते. यातून तलावाच्या विकासाची कामे करता येत नाहीत. अनेकांनी तलावांवर अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटविण्यासाठी जि. प. आणि सिंचन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.
गावांची स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी आहे. काही उपद्रवी नागरिकांकडून सर्वत्र घाण केली जात आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी राबविण्याची मागणी होत आहे.
बंधारा दुरुस्तीसाठी निधी द्यावा
वरोरा : तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने शिवारात अनेक बंधारे बांधले. बंधाऱ्यात सध्या पाणी आहे; मात्र काही ठिकाणी बोगदे पडल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.