अकृषक करात पाच पटीने वाढ करण्याची मागणी
By Admin | Updated: December 18, 2014 00:50 IST2014-12-18T00:50:04+5:302014-12-18T00:50:04+5:30
वापरात नसलेल्या निवासी भुखंडावरील वार्षिक अकृषक करात पाच पटीने वाढ करून आकारणी करण्याची मागणी जाणता राजा संघटनेने शासनाकडे केली आहे.

अकृषक करात पाच पटीने वाढ करण्याची मागणी
चंद्रपूर : वापरात नसलेल्या निवासी भुखंडावरील वार्षिक अकृषक करात पाच पटीने वाढ करून आकारणी करण्याची मागणी जाणता राजा संघटनेने शासनाकडे केली आहे.
अनेक ठिकाणी कृषी योग्य शेतजमिनींना अनावश्यकपणे अकृषक करून निवासी वापराचे लेआऊट म्हणून विकणे हा भरमसाठ फायद्याचा धंदा मोठ्या तेजीत सुरु आहे. जिकडे तिकडे ले-आऊट पडल्याने छोट्या मोठ्या सर्व शहराच्या मार्गावर दूरपर्यंत लेआऊट दिसून येतात. या व्यवसायातील भरमसाठ फायद्यामुळे विक्रीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे लेआऊट निर्माण होत आहेत.
लेआऊट विक्रेत्ये फसव्या जाहिराती, इनामांचे आमीष दाखवत आहेत. तर कमीशनच्या लालसेपोटी दलालांनी टाकलेल्या जाळ्यात ग्राहक फसत आहेत. त्यामुळेच सर्वसामान्यांकडून अशा अकृषक भूखंडामध्ये गरजेशिवाय अनावश्यकपणे गुंतवणूक होत आहे.
गरत नसतांनाही केवळ गुंतवणूक करून लाभ मिळविण्याच्या अमिषाने खरेदी केलेले प्लॉट अनेक वर्ष तसेच पडून असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. या व्यवहारातून ले-आऊट विक्रेते काही महिन्यातच प्रचंड नफा कमावून मोकळे होत असले तरी ग्राहकांचे अनेक वर्षे वाट पाहण्यातच जात आहेत. अडचणीच्या वेळेसही ही गुंतवणूक कामी पडत नाही. तसेच प्लॉट विकतांना या व्यवसायातील दलाल अडवणूक करून प्लॉटधारकांना वाजवी भाव सुद्धा मिळू देत नाही. या व्यवसायामुळे कृषीयोग्य जमिनीमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रचंड वेगाने घट होत आहे.
शासनाने अकृषक करात वाढ केल्यास ग्राहक देखील विचारपूर्वक गुंतवणूक करतील आणि शासनाकडे देखील विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध होऊ शकतो. या निधीचा उपयोग उर्वरीत कृषीयोग्य जमिनीवर शेतकऱ्यांना सिंचन सोयी करण्यासाठी अनुदान म्हणून करावा, अशी मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)