चंद्रपुरातील नद्यांमध्ये कर्तव्यशून्यतेची घाण
By Admin | Updated: December 10, 2014 22:53 IST2014-12-10T22:53:51+5:302014-12-10T22:53:51+5:30
चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले.

चंद्रपुरातील नद्यांमध्ये कर्तव्यशून्यतेची घाण
रवी जवळे - चंद्रपूर
चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले. वेकोलिचे ओव्हरबर्डन, नागरिकांचे अतिक्रमण व दिवसागणिक वाढत जाणारा गाळ, यामुळे या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्यच बाधित झाले. या नद्यांना स्वच्छ करून प्रवाह सुरळीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय यंत्रणेलाच या निर्णयाचा विसर पडल्याने चंद्रपुरातील इरई व झरपट नद्यांना पवित्र करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर शहर आधीच हॉट सिटी म्हणून गणले जाते. त्यामुळे या शहराच्या पालनपोषणासाठी पाण्याची गरज सर्वाधिक महत्त्वाची आहे. चंद्रपुरातून इरई व झरपट नदी वाहते. या नद्याच शहराचे महत्त्वाचे पाण्याचे स्रोत आहे. चंद्रपूरसारख्या उष्ण शहरात दोन नद्या वाहत असतानाही या नद्याचे जतन प्रशासन करू शकले नाही. इरई नदीची सध्याची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. नदी आहे की गटारगंगा हेच कळणासे झाले आहे. चंद्रपूर व परिसरातील गावांमध्ये वेकोलिच्या खाणी आहेत. या खाणीचे महाकाय ओव्हरबर्डन इरई नदीपात्राच्या काठावर एखाद्या राक्षसासारखे उभे आहेत. ओव्हरबर्डनने नदीचा नैसर्गिक प्रवाहच गिळंकृत केला आहे. याशिवाय या नदीपात्रात नागरिकांनी अतिक्रमणही केले आहे. विशेष म्हणजे, या नदीच्या पात्रात वर्षानुवर्ष साचलेला गाळ उपसण्याचे सौजन्य आजवर प्रशासनाने व पर्यायाने शासनाने दाखविले नाही. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले आहे. मात्र प्रशासनाला कधी जाग आली नाही. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे.
झरपट नदी तर पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे. झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकाऱ्याने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणाऱ्यांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून स्थानिक राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे. १५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारीकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. शहरातील अनेक भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छीनाल्याचेही काही पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी या नद्यांची स्वच्छता करणे, गाळ उपसणे, खोलीकरण करणे याबाबत प्रशासकीय स्तरावरून विचार झाला होता. नदी संवर्धन योजनेंतर्गत केंद्र शासनाने यासाठी निधी द्यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्तावही पाठविण्यात येणार होता. मात्र उदासीन प्रशासनाला याचा आजही विसर पडला आहे.