मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा
By Admin | Updated: January 27, 2015 23:29 IST2015-01-27T23:29:31+5:302015-01-27T23:29:31+5:30
मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो.

मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा
नियमांचे पालन आवश्यक : रेडिएशन ठरू शकतात जीवघेणे
चंद्रपूर : मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. इतकेच नाही तर एका प्रयोगानुसार गरोदरपणाच्या काळात मोबाईलच्या वापरामुळे त्याच्यातून निघणारी किरणे होणाऱ्या बालकांवर नकारात्मक प्रभाव टाकतात.
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या किरणांचा मोठा प्रभाव हृदयावरही पडतो. माणूस हा विद्युत संवेदनशील म्हणजे इलेक्ट्रिकली सेन्सेटिव्ह असतो. जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मोबाईलमधून येतात, तेव्हा ते हृदयाला प्रभावित करतात. याच्या अधिक वापरामुळे इतर काही लक्षणेही दिसतात.
यामध्ये डोक्याच्या त्वचेमध्ये जळजळ होणे, थकवा येणे, झोप न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थपणा, हृदयाचे ठोके वाढणे इतकेच नाही तर पचनक्रियेवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
युरोपीय रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधनानुसार मोबाईलमधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे किडनी स्टोन किंवा आरोग्यासंबंधी अन्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या वापरामुळे कर्करोग झाला असे सांगण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नसतो. कारण मोबाईल वापरण्याआधीची आकडेवारी, मोबाईल वापरल्यानंतरची आकडेवारी, तसेच मोबाईल किती प्रमाणात वापरला याची आकडेवारी आणि त्यातून सांख्यिकीदृष्ट्या काढलेला निष्कर्ष ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. म्हणूनच याबाबतचे ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत, पण तरीही आपल्याला अनेक वर्षांपासून किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम माहीत असल्याने आपण त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
भारतात जवळपास ९० कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करतात.
रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना, इतकेच नाही तर रेल्वे रुळ ओलांडतानादेखील माणसे मोबाईलवर बोलत असतात. त्यातूनच अपघाताच्या अनेक घटना घडतात, पण तरीही आपण जागृत होत नाही. ‘प्राण जाये पण मोबाईल न जाये’ अशी स्थिती आपल्याकडे आलेली दिसते, पण ही परिस्थिती खूप घातक आहे.यासाठी प्रत्येकांनी मोबाईलचा वापर करताना जपून केल्यास आपला आणि दुसऱ्याचा जीव वाचू शकतो.
जबाबदारी कुणाची?
महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या मोबाईल टॉवरची जबाबदारी नेमकी कुणाची याबाबत विविध तर्क लावले जात आहे. महानगरपालिकेकडून मंजूरी मिळाल्यानंतर प्रदूषन नियंत्रण मंडळ आणि बीएसएनएन यांचीही जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या माध्यमातून प्रदूषण वाढत आहे.
चंद्रपूर शहरातील मोबाईल टॉवर्स
चंद्रपूर शहरात जळपास १२५ च्या वर मोबाईल टॉवरची संख्या आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, कोणताही नियम न पाळता वाट्टेल तिथे टॉवर उभे केले जात आहे. महानगरपालिकेकडे नोंद असलेल्या अनेक टॉवरची देखभाल नेमकी कशी होते याची खातरजमा कुणीही करत नाही. रेडिेयेशन अधिक असल्याने आजार बळावतात. आता नागरिकांनीच यासाठी जागृत होणे गरजेचे आहे.