निवडणूक अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी
By Admin | Updated: July 20, 2015 00:45 IST2015-07-20T00:45:00+5:302015-07-20T00:45:00+5:30
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात ग्रामपंचायत ..

निवडणूक अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी
हक्काच्या दोन सुट्टीवर संक्रांत : सुट्टीच्या दिवशीच ठेवले कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण
तळोधी (बा) : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाकडून नेहमीप्रमाणे कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी प्रशिक्षणाची खास सोयही करण्यात आली आहे. मात्र नागभीड तालुका निवडणूक अधिकारी यांनी हे प्रशिक्षण सुटीच्याच दिवशी ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या दोन सुटीवर सक्रांत आली आहे. तसेच मागील दोन ग्रामपंचायत निवडणुकांचे मानधन १० वर्षाचा कालावधी लोटून अद्यापही न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
शासनाला कोणत्याही प्रकारची राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कामे करावयाची असली तर त्या प्रक्रियेत शिक्षकांना अवश्य सामावून घेतले जाते. आतापर्यंतच्या प्रक्रियेतून असाच अनुभव आला आहे. एवढा विश्वास शिक्षकांप्रति शासनाला आहे. कारण शिक्षक बांधव कोणतीही कुरकूर न करता त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी सहजतेने व विश्वासाने पार पाडतात. म्हणून शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षकांवरच अवलंबून असल्याचे दिसून येते. मात्र हे करताना शिक्षकांवर अन्याय होतो काय, किंवा त्यांच्या मानसिकतेचा विचार होत नसल्याची बाब पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आली आहे.
नागभीड तालुका निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीकरिता प्रशिक्षण देण्यासाठी सुटीच्याच कालावधीची निवड केली आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची हक्काच्या दोन दिवसांच्या सुटीवर गदा येणार आहे. इतकेच नव्हे तर निवडणूक पथकांची निवड करताना बहुतांश जि.प. शिक्षकांचीच मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांच्या पथकात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, हायस्कूल शिक्षक व इतर विभागाचे अधिकारी मात्र मतदान अधिकारी म्हणून काम पहाणार आहे.
ही पथक निर्मिती प्रक्रिया कोणत्या आधारावर केली, हे मात्र समजले नाही. कारण जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र कर्मचाऱ्यांची निवडणूक पथकात निवड करताना सामान्यता त्यांची पद, कार्यालय, शिक्षण, मिळणारी वेतनश्रेणी यांचा विचार केलेला आहे. पण नागभीड तालुक्यात मात्र याकडे लक्ष दिले गेलेले नाही.
याशिवाय यापूर्वी झालेल्या दोन ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता सहभागी कर्मचाऱ्यांचे मानधन दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याची चर्चा शिक्षक वर्गात होताना दिसत आहे. न मिळालेले मानधन, प्रशिक्षणाकरिता सुटीचा कालावधी तसेच पथक निवडीमध्ये असलेली अनियमितता यामुळे शिक्षक वर्गात असंतोष दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, निवडणूक स्थळी असणारी अव्यवस्था व जबाबदार अधिकाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रियेतील वेळकाढू धोरण, यावरही शिक्षकांमध्ये आवडीने चर्चा रंगत असल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)