चंद्रपुरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: July 21, 2015 01:00 IST2015-07-21T01:00:41+5:302015-07-21T01:00:41+5:30
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत

चंद्रपुरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत कमालिचे उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. शहरातील काही भागात घंटागाड्यांना प्रतिसाद न देता नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महानगर पालिकेने शहरातील घनकचरा संकलन करण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी घंटागाड्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. मात्र मोठ्या इमारतींमध्ये राहणारे अनेकजण घरातील कचरा खाली उतरून घंटागाडीपर्यंत नेऊन देण्यासाठी कंटाळा करतात. नंतर जेव्हा जास्त कचरा जमा होतो. तेव्हा मग तो कचरा मिळेल त्या ठिकाणी फेकल्या जातो. शहरातील अनेक भागात असा प्रकार सुरू असल्याने घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
येथील तुकूम परिसरातील प्रभाग दोनमध्ये कारमेल अकॅडमीच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा, शिळे अन्न, प्लॉस्टिक पिशव्या टाकत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिळ्या पदार्थांची दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा जीवजंतू यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेऊनच पुढे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
मोकाट जनावरांपासून धोका
४घनकचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरांचा कळप उभा असतो. त्यामुळे या जनावरांपासून विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छ भारत मोहिमेचा फज्जा
४एकीकडे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे, तर दुसरीकडे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे. या घनकचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे चंद्रपूर महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर मनपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मलबा रस्त्यावर
४शहरातील विविध वॉर्डात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. मात्र नाल्यातील मलबा एकतर नालिच्या काठावर अथवा रस्त्यावर टाकला जातो. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या मलब्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचत आहे. नालितून काढण्यात येणारा मलब्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.