‘त्या’ तीन भावंडांवर उदरनिर्वाहाचे संकट
By Admin | Updated: March 28, 2016 00:50 IST2016-03-28T00:50:38+5:302016-03-28T00:50:38+5:30
चार वर्षापूर्वीच पित्याचे छत्र हरपले आणि चिमुकल्या तीन भावंडावरील आईचाही आधार हिरावल्याने सावली येथील मोहुर्ले परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

‘त्या’ तीन भावंडांवर उदरनिर्वाहाचे संकट
नियतीने डाव साधला : चार वर्षांपूर्वी पित्याचे तर आता मातेचे छत्र हिरावले
सावली : चार वर्षापूर्वीच पित्याचे छत्र हरपले आणि चिमुकल्या तीन भावंडावरील आईचाही आधार हिरावल्याने सावली येथील मोहुर्ले परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेने तीन मुले निराधार असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गजानन मोहुर्ले यांचे कुटुंब मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. अशातच चार वर्षापूर्वी गजाननने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी बेबीबाईने मुलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चार वर्षापासून काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत होती. मात्र शुक्रवारी जंगलामध्ये सरपणासाठी गेली असता तिला फीट आली. सोबतच्या महिलांनी तिला तत्काळ गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र शनिवारी तिची प्राणज्योत विझली. त्यामुळे परिसरात हळहळ पसरली आहे.
आई-वडिलांच्या निधनाने तीन भावंडे मात्र निराधार झाली आहेत. मोठा मुलगा अमित गजानन मोहुर्ले (१७) व मुलगी सायली (१५) हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. लहान मुलगा विशाल (१२) हाही शिकत आहे. घरात कुठलीही शेती नाही की उपजीविकेचे दुसरे साधन नाही. मजुरी करून उदरनिर्वाह करणे हाच त्याचा रोजगार. मात्र तीनही भावंडे लहान असल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियतीने आपला डाव साधून अमीत, सायली व लहानगा विशाल या निरागस भावंडाचे मातृ-पितृ छत्र हिरावले. याची त्या भावंडांना जाणीव असली तरी त्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे. हा साऱ्या समाजमनाचा चिंतनाचा विषय आहे. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे मायबाप लोकप्रतिनिधींनी आणि दानशुरांनी या आपत्तीग्रस्त तीन भावंडांकरिता मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)