नामांकन रद्द केलेल्या उमेदवारांना न्यायालयाचा दिलासा
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:34+5:302015-07-25T01:14:34+5:30
येथील ग्राम पंचायत निवडणुकीत दोन उमेदवाराचे नामांकन छाननी दरम्यान निवडणूक अधिकारी यांनी रद्द केले.

नामांकन रद्द केलेल्या उमेदवारांना न्यायालयाचा दिलासा
घुग्घुस : येथील ग्राम पंचायत निवडणुकीत दोन उमेदवाराचे नामांकन छाननी दरम्यान निवडणूक अधिकारी यांनी रद्द केले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोन्ही उमेदवाराला निवडणूक लढविण्यास पात्र ठरविले असून त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
घुग्घुस ग्राम पंचायतीसाठी नामांकन सादर करते वेळी वॉर्ड क्रमांक ५ मधून तिनदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या ममता खैरे यांनी अनु. जाती सर्व साधारण आणि सर्वसाधारण या दोन्ही जागेकरीता दोन अर्ज दाखल केले. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडले. मात्र छाननी दरम्यान राखीव अनु. जाती सर्व साधारण जागेकरीता जातीचा दाखला जोडला नाही, या सबबखाली निवडणूक अधिकारी यांनी नामांकन रद्द केले. निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध ममता खैरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविण्यास पात्र ठरविले.
तर वॉर्ड क्रमांक १ मधून अनु. जाती प्रवर्गातून गणेश शेंडे यांनी नामांकन आॅनलाऊन अर्ज भरून निवडणूक अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह सादर केला. मात्र छाननी दरम्यान कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांचेही नामांकन रद्द करण्यात आले. याविरूद्ध उच्च न्यायालयात अपील केली असता गणेश शेंडे हे निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचा निर्णय शुक्रवारी न्यायालयाने दिला. त्यांनाही चिन्ह देण्यात आला आहे. (वार्ताहर)