१६ गावातील कापूस मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:36+5:30
दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले.

१६ गावातील कापूस मातीमोल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील १६ गावांमध्ये परतीच्या पावसाने कपाशीच्या बोंडे सडली. त्यामुळे पांढरे सोने मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. कापूस वेचणीला आला असताना दोन आठवड्यांपासून खंडित स्वरूपात परती पाऊस पडला. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धीडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली व बबापूर परिसरातील कपाशीची बोंडे सडली.
दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले. संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. यंदा सहा एकर शेतात कपाशीची लागवड केली. परंतु परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली.
उत्पन्नाची हमी राहिली नाही. लागवडीचा खर्च निघेल की नाही हा प्रश्नच आहे, अशी खंत आर्वी येथील शेतकरी जयपाल कपाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
धान उत्पादकांचे बजेट कोलमडले
ब्रह्मपुरी : यंदा धान शेतीसाठी समाधानकारक पाऊस आल्याने पिकाची जोमाने वाढ होऊन धानाचा निसवा व्यवस्थित झाला. समाधानकारक उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असताना अकाली पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली. गुरूवारच्या वादळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या. त्यामुळे धानाला आता अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. धान कापलेल्या बांधात पाणी साचले. शेतकऱ्यांना यंदा जादा उत्पादनाची अपेक्षा होती. हलक्या धानाची कापणी केल्यानंतर शेतकरी जड धान कापन्याच्या तयारी करत होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे धान पिकाला फटका बसला. भातशेती हेच तालुक्यातील मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे आर्थिक बजेट धानपिकावर अवलंबून असते. परंतु अवकाळी पावसामुळे वर्षभराचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.