कपाशी व मिरचीचे उभे पीक करपले
By Admin | Updated: October 16, 2015 01:36 IST2015-10-16T01:36:13+5:302015-10-16T01:36:13+5:30
दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे.

कपाशी व मिरचीचे उभे पीक करपले
गोवरी : दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे. मेहनतीने जोपासना केलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतातील पीक फळधारणेवर आले असताना धुव्वाधार पावसाने शेतातील कपाशीची व मिरचीची पिके भूईसपाट झाली.
उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र पावसाने शेतातील पिकांची पूर्णत: वाट लावून टाकली आहे. पावसानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची पिके वाळली आहे तर मिरचीची पिके तुटून पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हरदोना (खुर्द) येथील अरविंद गोविंदा ढवळे यांचे चार एकरातील कपाशीचे उभे पिक वाळले आहे तर राजुरा तालुक्यातील गोवरी येथील गणपत जुनघरी, अरुण भलमे, भास्कर जुनघरी, अमित रणदिवे, नामदेव देवाळकर, बंडू जुनघरी, रामदास देवाळकर, विकास पिंपळकर, नथ्थू पिंपळकर, संतोष जुनघरी, प्रभाकर जुनघरी तर पेल्लोरा येथील साईनाथ जुनघरी यांच्या शेतातील मिरचीचे व कपाशीचे पिक वाळत चालले आहे.
अतोनात खर्च करून हाती आलेले पिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हादरला आहे. डवरणी, निंदन व रासायानिक खते देऊन पिके वाढविली. मात्र अचानक आलेल्या संततधार पावसाने पिकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे आडवे झालेले पिक शेतकरी मजूर लावून उभे करीत आहे. एवढ्या मोठ्या शेतातील कपाशीचे पिक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. त्याकामी मजूर लावणेही शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. परंतु शेतातील उभे पिक पावसाने पूर्णत: आडवी झाल्याने शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय उरला नाही. पावसामुळे झाडाच्या मुळाजवळील माती वाहून गेल्याने झाडात उभे राहण्याची क्षमता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चावर पाणी फेरले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी पुरता हादरून गेला आहे. अतोनात खर्च करून पिक हाती येण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. (वार्ताहर)