खर्च कोट्यवधीचा ; तहान मात्र भागेना
By Admin | Updated: December 15, 2014 22:53 IST2014-12-15T22:53:05+5:302014-12-15T22:53:05+5:30
कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही.

खर्च कोट्यवधीचा ; तहान मात्र भागेना
कोरपना तालुका : अनेक पाणीपुरवठा योजना कुचकामी
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. परिणामी नागरिक तहानलेलीच आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची झड तालुक्याला बसण्याची शक्यता आहे.
तालुक्यात १९९८ पासून प्रादेशिक व वैयक्तिक गावाच्या योजना ५४ गावांसाठी मंजुर करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात पाईपलाईन दुरूस्ती व काही कामे अर्धवट ठेवण्यात आल्याने बऱ्याच गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्याआधी पकडीगुड्डम धरणातील ०.५३ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करून १९९४ मध्ये निर्णय घेण्यात आला. यासाठी सोनुर्ली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. याबरोबरच पिपर्डा गावातील नळ योजनेसाठी ३२ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. मात्र अद्यापही या क्षेत्रातील गावांना पाण्याचा पुरवठा नियमित झालेला नाही. बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन फुटली असुन नागरिकांना दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे.
मात्र, उपविभागीय अभियंत्यांनी साधी पाहाणी सुद्धा केलेली नाही. २००० ते २०१४ पर्यंत अनेक नळयोजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. यात २०११ मध्ये कन्हाळगाव पाणीपुरवठा योजना, राजुरगुडा २००९, वनसडी २०११, शरद बु., इंजापूर, खिर्डी, पिपर्डा, पिपरी, धामणगाव या गावातील योजनांना मंजुरी मिळाली. यात लाखो रुपयाची कामे केल्याचा कांगावा करण्यात आला. मात्र तहान भागत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सन १९९८ मध्ये मंजुर झालेली मांगलहिरा, हिरापूर, नवेगाव, सोनुर्ली, अकोला, पिपरी, परसोडा आदी गावातील योजनाची अंमलबजावणी योग्यपणे झालेली नसल्याने व दुरुस्तीच्या कामात सदर विभागाने कानाडोळा केल्याने पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत आहे. (वार्ताहर)