वाढत्या किमतीमुळे कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले
By Admin | Updated: March 3, 2016 01:13 IST2016-03-03T01:13:24+5:302016-03-03T01:13:24+5:30
टिळकनगर येथील कोट तलाव हा ब्रह्मपुरीचे हृदयस्थान आहे. या तलावाचे मोठ्या गाजावाजा करीत सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती.

वाढत्या किमतीमुळे कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले
काम थंडबस्त्यात : नागरिकांना सौंदर्यीकरणाची आतुरता
ब्रह्मपुरी : टिळकनगर येथील कोट तलाव हा ब्रह्मपुरीचे हृदयस्थान आहे. या तलावाचे मोठ्या गाजावाजा करीत सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. परंतु, वाढत्या किमतीमुळे या तलावाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने कोट तलावाची स्थिती पुन्हा जैसे थे होणार असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
ब्रह्मपुरी शहरात कोट तलाव, बारई तलाव व लेंडारी तलाव अशी मोठी जलसंपदा आहे. यापैकी मागील वर्षी कोट तलावाचे सौंदर्यीकरण करून नागरिकांना उत्साहाची पर्वनी देण्याचे स्वप्न दिले होते. कामे मोठ्या जोमाने दिवसंरात्र सुरू होती. पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. पण संबधीत विभागाकडून माहिती घेतली तर असे समोर आले की, जुन्या इस्टीमेटमध्ये तलावातील गाळ काढण्याविषयी एक मीटर खोलीचा समावेश होता.
पण प्रत्यक्षात गाळ सहा मिटर खोलीपर्यंत काढणे आवश्यक असल्याने सुधारीत इस्टीमेटमध्ये सहा मिटर खोलीचा समावेश करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले. मात्र मंजुरीची प्रतिक्षा करावी लागत असून वाढत्या किंमतीचे ग्रहण तलावाच्या सौंदर्यीकरणाला लागल्याची बाब समोर आली.
सध्या कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात असून दुसरीकडे नागरिकांना मात्र सौंदर्यीकरणाविषयी आतुरता लागली आहे. त्यामुळे या कामाला ताबडतोब मंजुरी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)