कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:44+5:30
तेलंगणा प्रशासनाकडून मिळणारी मदतही तोकडी. अशा कठीण परिस्थितीत हे मजूर अडकून पडले. कोरोनासोबतच उपासमारीच्या संकटाला कंटाळून अखेर त्या मजुरांनी परतीची वाट धरली. बहुतांश मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायदळ प्रवासातून पार केले. तर काही मजूर अद्यापही तेथेच अडकून आहेत.

कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात
वेदांत मेहरकुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो मजुरांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास तेलंगणा राज्य सीमेच्या शिरपूर गावात प्रवेश करून तेथून महाराष्ट्र राज्यात परतीची वाट धरली आहे. कोरोनाबाधित (रेड झोन) जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आलेल्या या मजुरांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता थेट महाराष्ट्रात एन्ट्री झाल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, डोळ्यात तेल ओतून काम करण्याचा डंगा मिरविणारे प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात गेलेल्या हजारो मजुरांना तेथेच अडकून रहावे लागले. हाती काम नाही. जवळ पैसा नाही. तेलंगणा प्रशासनाकडून मिळणारी मदतही तोकडी. अशा कठीण परिस्थितीत हे मजूर अडकून पडले. कोरोनासोबतच उपासमारीच्या संकटाला कंटाळून अखेर त्या मजुरांनी परतीची वाट धरली. बहुतांश मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायदळ प्रवासातून पार केले. तर काही मजूर अद्यापही तेथेच अडकून आहेत.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी तेलंगणा प्रशासनाने तसेच तेथील काही कंत्राटदारांनी कामावर असलेल्या मजुरांना मोठया वाहनांनी सीमावर्ती भागात पोहोचविले. परंतु याची कुठलीही पूर्वसूचना येथील प्रशासनाला मिळाली नाही. सायंकाळच्या सुमारास हजारोंच्या संख्येने मजुरांचा लोंढा महाराष्ट्रात दाखल झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. येथे आलेले बहुतांश मजूर हे कोरोनाबाधित रेड झोन जिल्ह्यातून आल्याचे कळते. विशेष म्हणजे, हजारोंच्या संख्येने आलेल्या मजुरांची कुठलीही आरोग्य तपासणी करण्यात आली नसल्याचीही माहिती आहे.
तेलंगणातून हजारोंच्या संख्येत आलेल्या मजुरांपैकी बहुतांश मजूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांची तालुका प्रशासनामार्फत पोहोचविण्याची व्यवस्था केलेली आहे. उर्वरित इतर जिल्ह्यातील मजुरांनादेखील त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याची व्यवस्था वरिष्ठ स्तरावर विचाराधीन आहे.
-प्रदीपकुमार राठोड, पोलीस निरीक्षक, गोंडपिपरी.
विशेष बसेसची व्यवस्था
टाळेबंदीमुळे तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात अडकलेले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मजूर त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून बसेसची व्यवस्था केली आहे. या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या मजुरांची त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करून त्यांना आणण्यात येत आहे. हे सर्व मजूर गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ही प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. हे सर्व मजूर अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून त्यांच्या शेतातील कामे खोळंबली जाणार आहे. या मजुरांचे वृद्ध आईवडील, मुले हे त्यांच्या स्वगावी असल्याने दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीमुळे मजुरांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या मजुरांना तत्काळ स्वगावी आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी विनंतीपर मागणी पालकमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली व सतत पाठपुरावा केला.
तेलंगणा राज्यातून आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी सीमावर्ती भागातील पोळसा पुलानजिक वैद्यकीय चमूकडून सुरूच आहे. आरोग्य विभाग याकडे गांभीयार्ने लक्ष देत आहे.
-डॉ. दिनेश चकोले, तालुका आरोग्य अधिकारी, गोंडपिपरी.