कोरोना संकटात ‘सारी’नेही काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:29+5:30

जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. चार दिवस शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. मात्र, रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात सारीची लक्षणे असलेल्यांची संख्याही बरीच वाढत आहे.

In the Corona crisis, ‘Sari’ also pulled on the head | कोरोना संकटात ‘सारी’नेही काढले डोके वर

कोरोना संकटात ‘सारी’नेही काढले डोके वर

ठळक मुद्देसहा जणांचा मृत्यू : आरोग्य तपासणीच्या अहवालानुसार ३२० संशयितांपैकी ५५ रूग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना उद्रेकाने जिल्ह्यात रूग्ण व मृतकांची संख्या वाढत असताना ‘सारी’ (सेव्हरल अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) आजारानेही तोंड काढले आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत सारी आजाराची लक्षणे असणाऱ्या ३२० रूग्णांची नोंद झाली. यातील ५५ जण पॉझिटिव्ह निघाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सारीमुळे ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला.
जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. चार दिवस शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. मात्र, रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात सारीची लक्षणे असलेल्यांची संख्याही बरीच वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सारी आजाराची लक्षणांच्या रूग्णांची संख्या ३२० आहे.
यातील ५५ रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर २४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १३ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. ३ जणांचा अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनासोबत लढताना आता नागरिकांना सारीच्या आजारासोबतही लढावे लागणार आहे. याकरिता जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी दक्षता घेऊन आजारापासून कसे दूर राहता येईल, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.

आजाराची लक्षणे
सारीच्या रूग्णाला सर्दी व ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते. शिवाय, अशक्तपणा येतो. न्युमोनिया, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे व रक्तशुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी लक्षणे आहेत. वयोवृद्ध, बालके व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना सारी आजाराची बाधा होते. श्वास घ्यायला खूप त्रास होणे, ताप, सर्दी, खोकला. फुप्फुसात सूज येणे ही आजाराची लक्षणे आहेत.

सारी आजारामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. कोणताही आजार हा सामान्य नसतो. त्यामुळे लक्षणे दिसतात तात्काळ रूग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून तपासणी करावी. स्वच्छता पाळावी, मास्क वापरावे, शारीरिक अंतर पाळावे, सॅनिटायझरने हात धुवावे.
-डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी (साथरोग), चंद्रपूर

अंगावर आजार काढू नका
सारीग्रस्त रूग्णांची श्वासोच्छश्वास घेण्याची गती कमी होते. श्वास घेताना हा रूग्ण धापा टाकतो. व्हॉयरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन हे सारीचे मूळ आहे. या आजाराची सुरूवात होताना शरीर आपणाला जागे करते. अंगावर आजार काढला की, हा त्रास सुरू होतो. दुखणे अंगावर काढणे चुकीचे आहे. त्यामुळे रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये, औषधोपचाराने हा आजार बरा होऊ शकतो. वयोवृद्ध, बालके व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना सारी लवकर होतो. श्वास घ्यायला खूप त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला येतो. फुप्फुसात सूज येणे आदी या आजाराचे लक्षण आहे.

Web Title: In the Corona crisis, ‘Sari’ also pulled on the head