नियंत्रण कक्ष तक्रार केंद्र न राहता समाधान केंद्र बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:06+5:302021-03-19T04:27:06+5:30
चंद्रपूर : नागरिकांच्या लहान लहान समस्या असतात. त्याकरिता त्यांना सरकारी कार्यालयात वेळ व पैसा खर्च करावा लागतो. याकरिता तालुक्यातील ...

नियंत्रण कक्ष तक्रार केंद्र न राहता समाधान केंद्र बनावे
चंद्रपूर : नागरिकांच्या लहान लहान समस्या असतात. त्याकरिता त्यांना सरकारी कार्यालयात वेळ व पैसा खर्च करावा लागतो. याकरिता तालुक्यातील समस्या निकाली काढण्याकरिता वरोरा तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. हे केंद्र केवळ तक्रार केंद्र न राहता समाधान केंद्र बनावे, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
वरोरा तालुका नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी
उपविभागीय अधिकारी शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक मुकेश सेलोकर, अभियंते कामडी, नायब तहसीलदार मधुकर काळे आदींची उपस्थिती होती.
वरोरा विधानसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. येथील अनेक गावातील ग्रामस्थांना दुरवरून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत होते. छोट्या कामाकरिता त्यांना दिवस घालवावा लागत होता, त्यामुळे त्यांना वेळ व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावे लागत होते. हे टाळण्याकरिता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत हे केंद्र स्थापन केले.
सदर नियंत्रण कक्ष १२ महिने आणि २४ तास तहसील कार्यालयाच्या एका दालनात सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना प्रशासनाला कोणतीही माहिती द्यायची असेल किंवा कोणत्याही विभागाबाबत तक्रार असेल तर त्यांना तालुका नियंत्रण कक्षात संपर्क केल्यास त्या तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे.