जिल्ह्यात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:29+5:30
उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा वाढायला लागला. त्यामुळे नागरिक पुन्हा वैतागू लागले. दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस हवा असल्याने त्यांची झोपच उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात बऱ्यापैकी पाणी जमा झाले असून नदी-नाले फुगू लागले आहेत. आतापर्यंत सरासरी ३७१.७ मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
हवामान खात्याने यंदा जून महिन्यातच मान्सूनचे आगमन होऊन दमदार पाऊस येथील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र जिल्ह्यात जून महिन्यात तसा पाऊस आला नाही. उलट उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा वाढायला लागला. त्यामुळे नागरिक पुन्हा वैतागू लागले. दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस हवा असल्याने त्यांची झोपच उडाली.
अनेकांचे पऱ्हे जमिनीतच कोमेजू लागले. दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर ओढवले. अशातच १० जुलैपासून पावसाने हजेरी लावणे सुरू केले. सोमवारी जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी रात्रीपासून चंद्रपूरसह जिल्हाभरातच संततधार पावसाला सुरूवात झाली.
बुधवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. संपूर्ण जिल्हाभरात सरासरी ३७१.७ मिमी पावसाची नोंद झाली.
संततधार पावसामुळे आता जलसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, इरई, उमा, शिरणा या नद्यांच्या पात्रातही आता बऱ्यापैकी पाणी वाहू लागले आहे. हा पाऊस जमिनीत मुरल्याने शेतकऱ्यांच्या बांधातही पाणी जमा झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.