दहा कोटींच्या खर्चातून ११२५ विहिरींचे बांधकाम

By Admin | Updated: December 29, 2015 20:13 IST2015-12-29T20:13:32+5:302015-12-29T20:13:32+5:30

चंद्रपूर : शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधा बळकट करण्यास हातभार लागत आहे.

Construction of 1125 wells from the expenditure of 10 crores | दहा कोटींच्या खर्चातून ११२५ विहिरींचे बांधकाम

दहा कोटींच्या खर्चातून ११२५ विहिरींचे बांधकाम

दहा कोटींच्या खर्चातून ११२५ विहिरींचे बांधकाम
चंद्रपूर : शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधा बळकट करण्यास हातभार लागत आहे. अनेकांच्या शेतात विहिरीमुळे सिंचनाचे साधन उपलब्ध झाले असून सरत्या वर्षात जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून १ हजार १२५ विहिरींचे बांधकाम झाले. या विहिरींवर तब्बल १० कोटी ६२ लाख ९८ हजारांचा खर्च झाला आहे.
सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना शेतपीक घेण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. विहिरीचे काम हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या जात असून विहिर बांधकामासाठी यापुर्वी मिळणारे १ लाखांचे अनुदान वाढवून गत वर्षीपासून ३ लाख रूपये अनुदान करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल सिंचन विहिर बांधकामाकडे वाढला आहे. यापुर्वी सिंचन विहिरीसाठी केवळ १ लाख रूपये अनुदान मिळायचे. या अनुदानात अनेकांच्या विहिरीचे बांधकाम अपुर्ण असायचे. काही ठिकाणी दगड लागल्यास त्या विहिरीच्या बांधकामास अधिक खर्च यायचा. त्यामुळे शेतकरी विहिर बांधकामास निरूत्साही असायचे. मात्र अनुदान वाढविण्याचा शासनाने निर्णय घेताच लाभार्थ्यांची संख्या वाढली असून अनेकांच्या शेतात आता विहिरी निर्माण झाल्या आहेत.
२०१४-१५ या वर्षांत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर बांधकामासाठी जिल्ह्यातील ९३० शेतकऱ्यांचे प्रस्ताव भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडे प्राप्त झाले. भूजल सर्व्हेक्षण विभागाने या सर्व प्रस्तावांना बांधकामाची मान्यता दिली. तर २०१३-१४ या वर्षांतील काही शिल्लक प्रकरणे असे १ हजार १२५ नव्या विहीर बांधकामांना २०१४-१५ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ६९९ विहिरींचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे.
या बांधकामावर १ हजार २०० पेक्षा जास्त मजुरांनी काम केले असून त्यांना मजूरी म्हणून २ कोटी १ लाख ६१ हजार रूपये तर बांधकाम साहित्यावर ३ कोटी २२ लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात आले आहे.
आजच्या स्थितीत ४३६ विहिरींचे अपूर्ण असून काही ठिकाणी दगड लागले तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यात येतील. या विहिरींचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाने ‘लोकमत’ला दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर बांधकामात चिमुर तालुक्याने आघाडी घेतली आहे. या तालुक्यात ३८९ सिंचन विहिरींचे बांधकाम प्रस्तावित असून २०० विहिरींचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर १८९ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. चिमुर पाठोपाठ ब्रह्मपुरी तालुक्याचा नंबर लागतो. या तालुक्यात १६७ विहिरींचे बांधकाम प्रस्तावित आहे.

निधी मिळण्यास अडचणी
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे साधन उपलब्ध होत असले तरी अनेक शेतकऱ्यांना दस्ताऐवजाची पुर्तता करूनही निधी मिळण्यास अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रस्ताव सादर करून दोन ते तीन वर्ष झाले. मात्र प्रस्तावावर कार्यवाही झालेली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंचन विहिरींचे प्रस्ताव लवकर निकाली काढण्याची मागणी आहे.

Web Title: Construction of 1125 wells from the expenditure of 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.