जिल्ह्यात काँग्रेसची घसरण
By Admin | Updated: October 19, 2014 23:51 IST2014-10-19T23:51:18+5:302014-10-19T23:51:18+5:30
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे.

जिल्ह्यात काँग्रेसची घसरण
चंद्रपूर : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. गेल्या २००९ च्या विधानसभेत येथे तीन ठिकाणी काँग्रेस आणि तीन ठिकाणी भाजपा अशी समसमान स्थिती होती. यावेळी भाजपाची जागा एकने वाढली. शिवसेनेलाही वरोऱ्यात संधी मिळाली. काँग्रेसला राजुऱ्यात संधी होती. मात्र अगदी कमी फरकाने पक्षाला ही जागा गमवावी लागली. वरोरा, चंद्रपुरात तर काँंग्रेसचा उमेदवार अनपेक्षितपणे तिसऱ्या क्रमावर फेकला गेला. चिमुरातही संधी होती. पक्षाकडून योग्य नियोजन झाले असते तर, कदाचित चित्र वेगळे राहिले असते.
भाजपाने वरोऱ्यात केलेली राजकीय खेळी कामी आली. या खेळीने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केले. काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आणि दुसरे म्हणजे भाजपा उमेदवाराला या मतदार संघात दुसऱ्या स्थानावर पोहचविण्याची संधी संजय देवतळे यांना पुढे करून मिळविली. यात नुकसान काँग्रेसचे झाले आणि फायदा मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा झाला. गेल्या दोन निवडणुकांपासून सुरू असलेल्या बाळू धानोरकरांच्या प्रयत्नांची सार्थकता या निवडणुकीने केली. विशेष म्हणजे, संजय देवतळे यांच्या उमेदवारीने ती पूर्ण झाली.