ग्रामीण राजकारणात काँग्रेसची सरशी
By Admin | Updated: August 6, 2015 23:57 IST2015-08-06T23:57:14+5:302015-08-06T23:57:14+5:30
जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून जाहीर करण्यात आला.

ग्रामीण राजकारणात काँग्रेसची सरशी
प्रस्थापितांना फटका : राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून जाहीर करण्यात आला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर समिकरण बांधणाऱ्यांना या निकालात चांगलाच धक्का बसला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारणात काँग्रेसने मुसंडी मारल्याचे निकालावरून दिसून येत आहे. भाजपाप्रणित पॅनलला भद्रावती, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यातच आपले वर्चस्व स्थापित करता आले. तर वरोरा तालुक्यात पहिल्यांदाच शिवसेनेने सरशी घेतली आहे.
भद्रावती तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व दिसून आले. त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार जवळपास बरोबरीने निवडून आले. मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतीपैकी भाजपाने २३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसला ८ वरच समाधान मानावे लागले. बहुजन समाज पार्टीने प्रथमच केळझर व जानाळा या २ ग्रामपंचायतीवर सत्ता बसविली. चिमूर तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाने बाजी मारली तर सत्ताधारी पक्षाच्या गटाला जोरदार हादरा बसला आहे. राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीपैकी भाजपा आणि काँग्रेसने १४ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. शेतकरी संघटनेने १३ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजप कब्जा केला असून काही ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. वरोरा तालुक्यात शिवसेनेने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत घेतले आहे. कोरपना तालुक्यात १७ पैकी काँग्रेसने ८ ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले. पोंभूर्णा तालुक्यात २६ पैकी काँग्रेस पक्षाकडे १४ तर भाजपाकडे ११ ग्रामपंचायत आहे. बल्लारपूर तालुक्यातील ९२ जागेपैकी ६५ जागा काँग्रेसप्रणित आघाडीच्या उमेदवारांनी काबीज केल्या. नागभीड तालुक्यात २९ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. (लोकमत चमू)