काँग्रेस आघाडीला पडला महाग
By Admin | Updated: May 17, 2014 23:37 IST2014-05-17T23:37:41+5:302014-05-17T23:37:41+5:30
गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचे तीन क्षेत्र यात येतात. या क्षेत्रामध्ये ओबीसी समाज जवळजवळ ४० ते ४६ टक्के आहे.

काँग्रेस आघाडीला पडला महाग
गडचिरोली-चिमूर क्षेत्रात : ओबीसी समाजाचा मोठा फटका
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचे तीन क्षेत्र यात येतात. या क्षेत्रामध्ये ओबीसी समाज जवळजवळ ४० ते ४६ टक्के आहे. या समाजाचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले. त्यामुळे हा समाज गेल्या अनेक वर्षांपासून नाराज आहे. ती नाराजी या समाजाने लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला दाखवून दिली. याचा सर्वाधिक फटका गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बसला. त्या खालोखाल आरमोरी व अहेरी विधानसभा क्षेत्रातही ओबीसी मतदारांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराकडे पाठ फिरविली. म्हणून भाजपचे मताधिक्य प्रचंड वाढले. दरवेळी काँग्रेससोबत राहणारा दलित व मुस्लीम समाज यावेळी अनेक ठिकाणी भाजपकडे गेला. अहेरी विधानसभा क्षेत्रात नाविसच्या प्रभावामुळे मुस्लीम समाजाने भाजपला जवळ केले. दलीत समाजाचेही अनेक मते भाजप सारख्या पक्षाला गेलेत. पक्षाऐवजी व्यक्तीला मतदान करण्यावर अनेकांनी भर दिला. एकूणच जातीयतेचा पगडा व परंपरागत मतदानाची व्होटबँक फुटल्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले. २४ हजार मतदारांनी नोटाचा वापर केला. हा मतदार बहुतांश सुशिक्षीत मतदार आहे. ही बाब भाजप व काँग्रेस या दोघांनीही लक्षात घेण्याची आहे. एकूणच संपूर्ण लोकसभा मतदार संघात परिवर्तनाचा कौल असला तरी हा कौल काही प्रमाणात आमदारांप्रती असलेली नाराजी या ही बाबीला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचा विचार करता नवे मतदार नाग विदर्भ आंदोलन समितीमुळे भाजपकडे वळलेत. येथेही आमदारांप्रती अॅन्टी इनकंबन्शी निश्चितपणे आहे. काँग्रेस पक्षाला तसेच राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला पक्षातील गटबाजी रोखता आली नाही. भाजपने या तुलनेत सरस काम केले. भाजपचा कुठलाही गट नेतेंच्या विरोधात गेला नाही. शिवसेनेची भक्कम साथ भाजपला मिळाली व भाजपचा विजय सुकर झाला. (जिल्हा प्रतिनिधी)