काँग्रेसची ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ मोहीम
By Admin | Updated: July 14, 2017 00:22 IST2017-07-14T00:22:51+5:302017-07-14T00:22:51+5:30
हे फसणवीस सरकार आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून ‘माझी कर्जंमाफी झाली नाही

काँग्रेसची ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ मोहीम
विजय वडेट्टीवार : पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचे संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हे फसणवीस सरकार आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून ‘माझी कर्जंमाफी झाली नाही’ असे फार्म शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम आखली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या या मोहीमेची सुरूवात ब्रह्मपुरी तालुक्यातून करण्यात आली असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कर्जमाफीवरून विरोधक येत्या पावसाळी अधिवेशात सरकारला घेरले जाणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच आ. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
कर्जमाफीबाबत राज्य सरकार केवळ ‘जीआरवर जीआर’ काढत आहे. ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ज्या अटी लादल्या त्यामुळे केवळ ३० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी येत्या २० जुलैपर्यंत तालुकानिहाय दिंडी काढून शेतकऱ्यांकडून ‘‘फार्म’ भरुन घेतले जाणार आहे. यावर गावांमध्ये चावडी वाचनही केले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून गोळा झालेले ‘माझी कर्जंमाफी झाली नाही’ हे फार्म प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांकडे देणार आहे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.
शासन दररोज नवनवीन जीआर काढून कर्जमाफीबाबत अटी लादत आहे. यामुळे राज्यातील एक कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ३० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. उर्वरित शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ९६ हजार शेतकरी वंचित राहणार असल्याचेही आ. वडेट्टीवार म्हणाले. कर्जमाफी जून २०१६ पर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. ती जून २०१७ पर्यंत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी असती तर ८२ टक्के शेतकरी फायदा घेऊ शकले असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतीपूरक उद्योगासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. त्यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही आ. वडेट्टीवार यांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदु नागरकर, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख महेश मेंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्वीनी खोब्रागडे, जि.प.चे काँग्रेसचे गटनेते सतीश वारजुरकर, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, विनायक बांगडे, युवक काँग्रेसचे शिवा राव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.