मनपाच्या सभेत गोंधळ
By Admin | Updated: August 31, 2016 00:37 IST2016-08-31T00:37:51+5:302016-08-31T00:37:51+5:30
शहरातील अनेक भागात मागील पाच-सहा दिवसांपासून अनियमीत पाणी पाणीपुरवठा सुरू आहे.

मनपाच्या सभेत गोंधळ
महानगरपालिकेची आमसभा : संदीप आवारी यांनी शर्ट काढून व्यक्त केला रोष
चंद्रपूर : शहरातील अनेक भागात मागील पाच-सहा दिवसांपासून अनियमीत पाणी पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे मात्र पाणी पुरवठा कंत्राटदार व मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी पार पडलेल्या आमसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान पाणीपुरवठ्यावर रोष व्यक्त करीत नगरसेवक संदिप आवारी यांनी शर्ट काढून सभागृहात प्रवेश केला व ठिय्या आंदोलन केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यानंतर महापौरांनी नवीन निविदा काढण्याचे प्रशासनाला निर्देश देताच नगरसेवकांचा रोष मावळला.
महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, आयुक्त संजय काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमसभेला सुरूवात झाली. आमसभेच्या विषय पत्रिकेत स्वच्छता मोहिमेचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर ठरविणे हा एकमेव विषय होता. परंतु, सणासुदीच्या काळात शहरवासीयांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहता संदिप आवारी यांनी शर्ट काढून पाणी प्रश्नावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मागील दीड वर्षांपासून पाणीप्रश्नावर सातत्याने चर्चा होत आहे. मात्र, कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कंत्राटदाराला पंप खरेदी करण्याचा ठराव झाला होता. मात्र प्रशासनाने पंप खरेदी करून न दिल्याने संदीप आवारी यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रश्नांवर संजय वैद्य, अनिल रामटेके, मनोरंजन रॉय, बंडू हजारे, अंजली घोटेकर यांच्यासह अनेक नगरसेवकही आक्रमक होते.
महापौर राखी कंचर्लावार यांनी पाणी प्रश्नावर चर्चेचे आश्वासन देताच आवारी यांनी शर्ट परिधान केला. शहराच्या लोकसंख्येनुसार ५७७ किलोमिटर पाईपलाईन आवश्यक आहे. मात्र आजघडीला १४४ किलोमिटरच पाईपलाईन आहे. यातील १२० किलोमिटरची लाईन पुर्णत: नादुरुस्त आहे. या योजनेवर ५.४० कोटींचा खर्च आहे. त्यातुलनेत योजनेचे दर कमी आहेत. त्यामुळे नवीन कंत्राटदार एवढ्या कमी रकमेत योजना चालविणार नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेही योजना चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. २४५ कर्मचारी नसल्याने ही योजना महानगर पालिकेला चालविणे शक्य नसल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी स्पष्ट केले. (स्थानिक प्रतिनिधी)
नागरकर यांनीही मांडली बाजू
नगरसेवक अंजली घोटेकर आणि रामू तिवारी यांनी अवैध मोबाईल टॉवरचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, यासाठी नागरकर वेलमध्ये बसले. त्यानंतर नागरकर यांनी बोलण्याची संधी देण्यात आली. २२ फेब्रुवारी २००७ मध्ये मोबाईल कंपनीला जागा किरायाने दिली. यावेळी आपण नगरसेवक नव्हतो. १० वर्षाचा करार आहे. टॉवर अनधिकृत असेल तर काढून टाकावे, अशी मागणी आयुक्त काकडे यांच्याकडे केली. त्यानंतर नागरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षडयंत्र आहे. सभागृह नेते रामू तिवारी हे सभागृहाची दिशाभूल करीत आहेत. अनेकदा ते सभागृहात बोलतात. मात्र त्याची नोंद घेतली जात नाही. आपल्या सोयीनुसार दबाव टाकून तिवारी ठराव लिहून घेतात. महापौरांसह त्यांचे अन्य सहकारी प्रशासनात दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप नागरकर यांनी केला.
स्वच्छता दूत म्हणून डॉ. बंग, डॉ. आमटे, विवेक ओबेरॉय यांची नावे चर्चेत
स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी चंद्रपूर मनपाचे स्वच्छता दूत नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारच्या सभेत स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग, प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांचे नाव चर्चेला आले. यापैकी महाराष्ट्र भूषण डॉ. बंग यांच्या नावाला बहुतांश नगरसेवकांनी सहमती दर्शविली.
टॉवरचा मुद्दा गाजला
काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांच्या घरावर मोबाईल कंपनीचे टॉवर उभारले आहे. यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश उपायुक्तांना दिले आहेत. येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण होईल. दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.