गोसेखुर्दच्या पाण्यासाठी संघर्ष

By Admin | Updated: March 28, 2016 00:47 IST2016-03-28T00:47:59+5:302016-03-28T00:47:59+5:30

आसोलामेंढा तलावाच्या धर्तीवर घोडाझरी तलावातही गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ...

Conflicts for Goseukha's water | गोसेखुर्दच्या पाण्यासाठी संघर्ष

गोसेखुर्दच्या पाण्यासाठी संघर्ष

घोडाझरी संघर्ष समिती : ९ एप्रिलला ४० गावांत बंद
नागभीड : आसोलामेंढा तलावाच्या धर्तीवर घोडाझरी तलावातही गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्थापन झालेल्या घोडाझरी संघर्ष समितीचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील ४० गावांमध्ये ही समिती ९ एप्रिल रोजी बंद आंदोलन छेडणार आहे.
१ नोव्हेंबर २०१५ रोजी घोडाझरी विकास परिषदेचे आयोजन करून या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. यानंतर या समितीने क्षेत्रातील आमदार, खासदार, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्या प्रत्यक्षभेटी घेवून मागणीचे महत्त्व पटवून दिले. या मागणीचा सकारात्मक विचार नक्कीच करण्यात येईल, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले. पण प्रत्यक्षात मात्र फलनिष्पत्ती काहीच होत नसल्याचे या समितीचे म्हणणे आहे.
आसोला मेंढा तलावाच्या धर्तीवर गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडल्यास नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील सात हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. यासाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या घोडाझरी उपकालव्याच्या प्रस्तावित खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्च घोडाझरीत उपसा पद्धतीने पाणी सोडण्यावर येणार असेल तरी शासकीय अधिकारी मुद्दाम या उपसा पद्धतीकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
घोडाझरी संघर्ष समितीने ही बाब वेळोवेळी संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना कथन केली असली तरी कोणताही अधिकारी वा पदाधिकारी यांना समितीच्या या मागणीकडे किंवा सूचनेकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही.
नागभीड तालुक्यातील भातशेती पुर्णत: नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी या शेतीला बसत असला तरी दुसरा कोणताही उद्योग नसल्यामुळे या तालुक्यातील शेतकरी नाईलाजाने शेतीचा हा धंदा करीत आहेत. आता थोडी जागृती शेतकऱ्यांमध्ये व्हायला लागली असून घोडाझरी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी हा संघर्ष सुरू केला आहे. या संघर्षाचाच एक भाग म्हणून येत्या ९ एप्रिल रोजी लाभक्षेत्रातील संपूर्ण ४० गावातील शेतकऱ्यांनी आपआपल्या गावातील सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या एका बैठकीत घेतला. यात नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील गावांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Conflicts for Goseukha's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.