कोंडवाड्यांची अवस्था भयावह
By Admin | Updated: December 18, 2014 00:45 IST2014-12-18T00:45:44+5:302014-12-18T00:45:44+5:30
पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीपैकी बोटावर मोजण्या इतक्या कोंडवाड्यात जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय आहे.

कोंडवाड्यांची अवस्था भयावह
मूल : पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीपैकी बोटावर मोजण्या इतक्या कोंडवाड्यात जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय आहे. मात्र उर्वरित जवळपास ४० कोंडवाड्यांची स्थिती भयावह झाली आहे. चारा व पाण्याविना कोंडवाड्यात जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी असलेल्या कोंडवाड्यात वाऱ्यावर पडले आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात जनावरे दुसऱ्याच्या शेतात जाऊन गहू, ज्वारी, लाखोळी, सोयाबीन, भाजीपाला आदीचे नुकसान करतात. त्या जनावरांच्या मालकावर वचक बसावा, यासाठी मूल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये कोंडवाड्याची निर्मीती करण्यात येऊन बांधकाम करण्यात आले. हजारो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोंडवाड्याकडे ‘नऊ दिवस नवलाईचे’ या उक्तीप्रमाणे सरपंच व ग्रामसेवकांनी काही दिवस लक्ष घातले. मात्र त्यानंतर त्यांचे पुर्णत: दुर्लक्ष झाले. परिणामस्वरुप कोंडवाडे भकास झाले. त्यात जनावरांसाठी चारा व पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे सतत ३ ते ४ दिवस राहाणारे जनावरे मृत्युमुखीदेखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
मूल तालुक्यातील दाबगाव (मक्ता) या गावात अशीच परिस्थिती असल्याने काही शेतकऱ्यांची दगावली. कोंडवाड्यात अस्वच्छता तसेच ज्या टाक्यात पाणी साठविले जाते, त्या टाक्यात झाडे उगविली आहेत. हा प्रकार मूल तालुक्यातील गोवर्धन या गावात बघायला मिळते.(तालुका प्रतिनिधी)