चित्रपटगृहे, मॉल, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, सार्वजनिक वाचनालय, बगीचे सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे, परंतु अजूनही मंगल कार्यालयांत पन्नास व्यक्तींची अट कायम आहे व त्यापेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्यास, मंगल कार्यालय व्यवस्थापकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. फक्त त्यांच्याकडूनच हमीपत्र सक्तीने भरून घेतल्या जात आहे, पण त्यामध्ये डीजे, डेकोरेशन, कॅटरर्स, मंडळींना वगळण्यात आले. गावखेड्यात व शहरात खुल्या पटांगणावर मंडप टाकून बरीच लग्न होत आहेत. बरीच मंगल कार्यालये व्यवस्थापक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज करून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त लोकांना कार्यक्रमास मंगल कार्यालय उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये काही प्रामाणिक मंगल कार्यालय व्यवस्थापक शासनाच्या नियमाचे पालन करीत आहे. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने हा साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा आता रद्द करावा, अथवा शिथिल करून ५० लोकांची उपस्थितीची अट रद्द करावी, अशी मागणी मंगल कार्यालय संघटनेकडून होत आहे.
लग्नकार्यासाठी पन्नास व्यक्तींची अट रद्द करण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST