एकात्मतेचा संदेश देणारा सोहळा
By Admin | Updated: October 18, 2015 01:11 IST2015-10-18T01:11:23+5:302015-10-18T01:11:23+5:30
धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा हा समता, बंधुभाव व राष्ट्रीय ऐक्याची प्रेरणा देणारा असून ...

एकात्मतेचा संदेश देणारा सोहळा
चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा हा समता, बंधुभाव व राष्ट्रीय ऐक्याची प्रेरणा देणारा असून यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला हा सोहळा सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भोजन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १६ आॅक्टोबर २०१५ रोजी या भोजनवितरण कार्यक्रमाचा शुभारंभ भगवान गौतम बुद्ध व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ना. अहीर बोलत होते.
याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, भाजपाचे जिल्हा महासचिव राजेश मून, वनिता कानडे, सभापती अंजली घोटेकर, जि.प. सदस्य विजय वानखेडे, अनुप चिवंडे, सुभाष कासनगोट्टूवार, जितेंद्र धोटे, संतोष वडपल्लीवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यानिमित्त आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमास उपस्थित सर्व अनुयायींना शुभेच्छा दिल्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून आयोजित अन्नवितरण कार्यक्रम ही सामाजिक जबाबदारी व कर्तव्य भावना बाळगून केलेली कृती आहे. दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जात असून तो सातत्य ठेवून आयोजित केला जाईल, असे त्यांनी सांगितले. समाजातील शोषित, पीडित लोकांच्या कल्याणासाठी महामानव डॉ. बाबासाहेबांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांनी राष्ट्राला अर्पण केलेली घटना सामाजिक न्यायाची प्रतिक ठरली, असेही ते म्हणाले.
इंदू मिलमध्ये अंतरराष्ट्रीय किर्ती लाभेल अशा प्रकारचे डॉ. बाबासाहेबांचे स्मारक राज्य शासनाने उभारण्याचे कार्य चालविले असून ते या देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वांना प्रेरणा देणारे स्मारक ठरेल, असेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)