पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:21+5:302021-02-05T07:39:21+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची कामे मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहेत. सामान्य नागरिकांना पाणंद रस्त्याअभावी त्रास होऊ ...

पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
चंद्रपूर : जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची कामे मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहेत. सामान्य नागरिकांना पाणंद रस्त्याअभावी त्रास होऊ नये, मजुरांना मागणीप्रमाणे कामे मिळावीत म्हणून नियोजनपूर्वक पाणंद रस्ते व मनरेगाच्या कामात वाढ करून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिले.
पालकमंत्री पाणंद रस्ते योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) मंगेश आरेवार, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, दीपक मल्होत्रा, विभागीय वन अधिकारी एस. व्ही. जगताप आदी उपस्थित होते. मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत संत्रा लागवडीसाठी चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्याशी बोलणे करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत सध्या ५६ हजार ७६० ग्रामपंचायतींची व ४ हजार २५८ यंत्रणांची कामे मंजूर झाली आहेत. आजमितीस १२९२ कामे ग्रामपंचायतींची आणि ९३ कामे यंत्रणांची सुरू आहेत. सध्या एकूण १ लाख ४८ हजार ६२६ जॉबकार्डधारक कार्यरत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मासिक मनुष्यदिन निर्मितीची टक्केवारी ९८.२९ टक्के असल्याची माहिती रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली.