अपुऱ्या निधीबाबत जिल्हा परिषदचे पीआरसीसमोर गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:09+5:302021-02-10T04:29:09+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत असताना नवनवीन योजना कार्यान्वित केल्या जात आहे. मात्र, अपुऱ्या ...

अपुऱ्या निधीबाबत जिल्हा परिषदचे पीआरसीसमोर गाऱ्हाणे
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत असताना नवनवीन योजना कार्यान्वित केल्या जात आहे. मात्र, अपुऱ्या निधीमुळे ही कामे मार्गी लावताना अडचणी निर्माण होतात. विकासकामांना ब्रेक लागतो. त्यामुळे याकडे लक्ष घालून सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याला भरघोस निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा, अशी मागणी जि. प. अध्यक्ष संध्या गुरगुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर व जि. प. पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पंचायती राज समितीकडे केली. दरम्यान, लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालासंदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविल्याचे समजते.
घटनात्मक दर्जा असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे मंगळवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील अनौपचारिक चर्चेत अपुऱ्या निधीचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी समितीचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर व २८ सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विविध विकासात्मक अडचणी समितीसमोर मांडल्या. यामध्ये जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायती तेलंगणा राज्यात गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासाठी अडचणी येतात, जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, कामकाजात समन्वय साधणे अडचणीचे ठरत आहे, कोविड १९ महामारीच्या काळात जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने चांगली कामगिरी केली. मात्र, कर्तव्य बजावताना मनुष्यबळासह नवीन तांत्रिकीकरणाची अनेक गरजा लक्षात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीकरण किती गरजेचे आहे, हेही समजल्याचे जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी समितीसमोर चर्चेदरम्यान नमुद केले. पशुसंवर्धन विभागाला निधीअभावी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे लम्पीसारख्या आजाराचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम वर्गखोल्या, संगणकीकरण व विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जि. प. कटिबद्ध आहे. परंतु अपुऱ्या निधीमुळे कामे मार्गी लावताना अडचणी निर्माण येतात. त्यामुळे समितीने याकडे लक्ष घालावे आणि सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याला जादा निधी देण्याची मागणी जि. प. पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, जि. प. सदस्य संजय गजपूरे, खोजराम मरस्कोल्हे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदी उपस्थित होते.
आज आरोग्य केंद्र, शाळा, पंचायत समित्यांना भेटी देणार
चंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात पंचायत राज समिती दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील आमदारांशी अनौपचारिक चर्चा करण्याचे नियोजन ठरले होते. ही चर्चा आटोपल्यानंतर जि. प. सदस्यांशी समितीने संवाद साधला. त्यानंतर २०१०-२०११ ते २०१६-१७ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची साक्ष नोंदिवण्यात आली. बुधवारी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती व पंचायत समित्यांना भेट देण्याबाबतही नियोजन केल्याचे समजते.