वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली तेंदूपानांचे संकलन
By Admin | Updated: May 27, 2014 23:37 IST2014-05-27T23:37:05+5:302014-05-27T23:37:05+5:30
एका महिन्यासाठी का होईना हजारो कुटुंबांना रोजगार देणार्या तेंदूपान तोडाईच्या व्यवसायाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र मजुरांना वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली जंगलात तेंदूपत्ता

वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली तेंदूपानांचे संकलन
विरुर (स्टे) : एका महिन्यासाठी का होईना हजारो कुटुंबांना रोजगार देणार्या तेंदूपान तोडाईच्या व्यवसायाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र मजुरांना वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली जंगलात तेंदूपत्ता तोडण्याचे काम करावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याच्या व्यवसायाला सुरूवात होते. उन्हाळा आला की, तेंदूपान कंत्राटदाराकडून कधी बोलावणे येते, याची अनेक कुटुंबे चातकासारखी वाट बघतात. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने मजुरांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये तेंदूपाने गोळा करण्याचा व्यवसाय अविरत सुरु आहे. यासाठी वन विभागाच्या प्रत्येक कार्यालयात तेंदूविभाग सुरू करण्यात आला आहे. या भागात तेंदू हंगामाला मे महिन्यात प्रत्यक्ष सुरुवात होते. १५ ते २0 दिवसांचा हा हंगाम असतो. त्यानंतर आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बडे कंत्राटदार आदिवासीबहुल भागात लिलावासाठी दाखल होतात. वनविभागाने तेंदू युनिटचा लिलाव केल्यानंतर मे महिन्यात तेंदू संकलनाच्या कामाला सुरुवात होते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतीवर राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर या तोडाईच्या कामात स्वत:ला गुंतवून घेऊन चार पैसे जमवायचे, असा क्रमच जणू ठरलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कुटुंब जादा पैसे मिळावे, म्हणून या तेंदू संकलनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातही सक्रीय होतात. मात्र येथे काम जास्त व दाम कमी अशी स्थिती असते. सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असल्याने हजारो मजूर पहाटेपासून आपल्या मुलाबाळांसह जंगलात पाने आणण्यासाठी जात आहेत. मात्र त्यांना अनेक वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो. मागील वर्षापासून वाढलेले वन्यप्राण्यांचे हल्ले लक्षात घेता, मजूर जीव मुठीत घेऊनच तेंदूपाने संकलनाचे काम केले जात आहे. वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली मजूर हे काम करीत आहेत. मात्र परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत आहे. ईकडे आड, तिकडे विहीर अशी मजुरांची स्थिती झाली आहे. (वार्ताहर)