वेकोलितून जातो बंद उद्योगांनाही कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:45+5:30
फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही समावेश आहे. मंदी व इतर कारणास्तव महाराष्ट्रातील ३० टक्के उद्योगच व्यवस्थित सुरू असून ७० टक्के उद्योग बंद आहेत.

वेकोलितून जातो बंद उद्योगांनाही कोळसा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलितून बंद असलेल्या लघू उद्योगांनाही कोळसा पुरवठा होत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या दीपक दीक्षित यांना एका व्हॉटस्अॅप कॉलच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी १९ मार्च रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दीक्षित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा होत असल्याची बाब नमुद केली आहे.
फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही समावेश आहे. मंदी व इतर कारणास्तव महाराष्ट्रातील ३० टक्के उद्योगच व्यवस्थित सुरू असून ७० टक्के उद्योग बंद आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ व वेकोलि अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुमारे ४२ हजार मे. टन कोळसा काळ्या बाजारात जात आहे. अधिकारी, दलाल व कोल माफिया हा कोळसा ७ हजार रुपये मे.टन ने खुल्या बाजारात विकत असून याची अंदाजे किमत ३१ कोटींच्या घरात आहे. ज्यामधून १० कोटी वजा जाता प्रत्येक महिन्याला २१ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेकोलि अधिकारी, दलाल व कोल माफिया कमवत आहे. अशी तक्रार करून प्रकरणाची एसआयटी गठित करून वा केंद्र सरकारच्या अधिनस्त सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी दीपक भारतसिंह दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे कोळसा माफियांचे धाबे दणाणले आहे. परिणामी तक्रारकर्ते दीपक दीक्षित यांनी शहजाद नावाने असलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर कॉल करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान कॉल करणाऱ्या इसमाने महाराष्ट्र मायनिंग कार्पोरेशनच्या कोळसा घोटाळासंबंधी तुने तक्रार केल्यामुळे डब्लूसीएलने कोळसा देणे बंद केले आहे. त्यामुळे आम्हा चौघांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असून आमचे कोळशाचे काम बंद झाले आहे. यावेळी अश्लाघ्य शब्दांचा वापर करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दीपक दीक्षित यांनी १९ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.