वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:47+5:30
हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळावले असून, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालये सध्या फुल्ल असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळावले असून, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालये सध्या फुल्ल असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच पहाटेच्या सुमारास धुके त्यानंतर गारवा, दुपारी काही प्रमाणात उन्ह आणि सायंकाळी पुन्हा गारवा निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत. विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातही औषधोपचार घेण्यासाठी येणाºयांची संख्या वाढली आहे. सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने काही रुग्ण खासगी रुग्णालयात तपासणी करीत आहेत.
वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना बहुतांशवेळा सहन होत नाही. लहान मुलांना सर्दी, ताप आणि खोकल्याने ग्रासले आहे. शहरातील काही बालरुग्णलयात सध्या गर्दी बघायचा मिळत आहे.
खासगी ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची गर्दी होत आहे. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. वातावरणातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने आरोग्य बिघडत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. तर काही रुग्ण खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेत आहेत. बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे असल्याची माहिती मिळाली आहे.