नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:39+5:30
२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली.

नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष
प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चार वर्षांपासून शहरातील हरित मित्र परिवाराने परिसरात चंदनवृक्ष लावण्याकरिता जनजागृती सुरू केली. वृक्षरोपणाचे महत्त्व ओळखून नागरिक व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने १२ हजार चंदनाची वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी शहरात एकही चंदन वृक्ष नव्हता हे विशेष.
२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली. चंदन वृक्ष लावताना हरित मित्र परिसराचे सदस्य स्वत: जावून मदत करतात. चंदनाचे रोपटे लावताना त्याच्या सभोताल तुरीचे दाणे किंवा पपईचे बियाणे टाकले जाते. चंदन रोपटे काही दिवस स्वत: अन्न घेवू शकत नाही. त्यामुळे चंदन वृक्षाला सभोवताल तूर व पपईपासून अन्न घेण्यास मदत होते. सातत्याने जनजागृती केल्याने चार वर्षांत १२ हजार चंदनाचे वृक्ष जगले आहेत. काही झाडांची उंची ३५ फुटाहून अधिक झालीआहे. जिल्ह्याचे तापमान उष्ण असल्याने चंदन वृक्षाची वाढ झपाट्याने होते. काही शेतकºयांनी चंदन वृक्ष बांधावर लावले. त्यांचीही वाढ मोठ्या झपाट्याने झाल्याची माहिती हरित मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.
१५ वर्षांनंतर होतो मोठा आर्थिक लाभ
चंदन वृक्षांचे वेळोवेळी संगोपन करण्याची गरज नाही. चंदनाचे रोपटे लावल्यानंतर दोन उन्हाळ्यात काळजी घेवून पाणी दिल्यास जिवंत राहते. वाढही झपाट्याने होते. १५ वर्षांनंतर मोठा आर्थिक लाभ होतो. संगोपनावर अधिक खर्च नसल्याने अनेक व्यक्ती चंदनाचे वृक्ष लावत आहे. वरोरा परिसरात येत्या काही दिवसात चंदन वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.
शेतकऱ्यांनी चंदन वृक्ष शेतीच्या बांधावर लावून दोन वर्षे काळजी घेतल्यास मोठा आर्थिक लाभ होतो. बाजारात चंदन वृक्षाला मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा काळानुसार आज विचार बदलविण्याची गरज आहे.
- किशोर उत्तरवार,
हरित मित्र, परिवार