दिशादर्शक फलकांमुळे नागरिकांची ‘दिशा’भूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:21 IST2018-06-16T22:21:19+5:302018-06-16T22:21:19+5:30
शहरात अंतर्गत सिमेंट रस्त्याबरोबरच चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या महामार्गावरील वाहने जाताना गावांची नावे माहिती व्हावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले. विजय चिमड्यालवार यांच्या राईस मिलजवळील या महामार्गावर लावलेले फलक अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लाखो रुपये करून लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची मोडतोड होत असताना प्रशासनाकडे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकाांचा आरोप आहे.

दिशादर्शक फलकांमुळे नागरिकांची ‘दिशा’भूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शहरात अंतर्गत सिमेंट रस्त्याबरोबरच चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या महामार्गावरील वाहने जाताना गावांची नावे माहिती व्हावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले. विजय चिमड्यालवार यांच्या राईस मिलजवळील या महामार्गावर लावलेले फलक अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लाखो रुपये करून लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची मोडतोड होत असताना प्रशासनाकडे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकाांचा आरोप आहे.
मूल शहराचा प्रवास स्मार्ट सीटीकडे करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष लक्ष देत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन मूल शहराचे बकालपण दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहराला दिशा मिळावी, यासाठी चंद्रपूर- गडचिरोली महामार्गाचे सिमेंटीकरण करून मुख्य रस्त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूलअंतर्गत लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनीने रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र शहरातील अंतर्गत बांधकामात येत असलेल्या सिमेंट रस्त्यावर अर्धवट कामे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अडणारे पाणी काढणे कठीण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिशादर्शक फलकाची दुरवस्था झाली.
कंत्राटदार व बांधकाम विभागाचे अधिकारी याच मार्गावरुन ये-जा करतात. पण, दुरूस्ती का करीत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. रात्रीच्या सुमारास हे दिशादर्शक फलक नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. यामुळे मोठा अपघात होणे अथवा भलत्याच मार्गाने पुढे निघून जाण्याचे प्रकार या मार्गावर घडत आहेत.