देशमुखगुड्यातील नागरिकांनी भीतीपोटी सणाकडे फिरविली पाठ

By Admin | Updated: August 21, 2015 01:18 IST2015-08-21T01:18:41+5:302015-08-21T01:18:41+5:30

वाढत्या डासांमुळे आणि हातपंपातील दूषित पाण्यामुळे देशमुखगुडा गावात गेल्या १५ दिवसांपासून हिवतापाच्या साथीने अख्खे गावच बेजार झाले आहे.

Citizens of Deshmukh, have turned their faces towards fear | देशमुखगुड्यातील नागरिकांनी भीतीपोटी सणाकडे फिरविली पाठ

देशमुखगुड्यातील नागरिकांनी भीतीपोटी सणाकडे फिरविली पाठ

गावात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण : शाळकरी मुलीचा बळी गेल्याने पसरली दहशत

लोकमतआॅन द स्पॉट
शंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवती
वाढत्या डासांमुळे आणि हातपंपातील दूषित पाण्यामुळे देशमुखगुडा गावात गेल्या १५ दिवसांपासून हिवतापाच्या साथीने अख्खे गावच बेजार झाले आहे. याच आजाराची लागण होऊन एका शाळकरी मुलीचा बळी गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षातून एकदा येणारा सणही आम्ही आनंदाने साजरा करू शकलो नाही, अशी खंत देशमुखगुड्यातील नागरिक डोळ्यात अश्रू आणून व्यक्त करीत होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी त्यांच्या मनात संताप दिसून आला.
टेकामांडवा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या देशमुखगुडा गावची लोकसंख्या केवळ ७० असून १२ घरांची वस्ती आहे. हिमायतनगरपासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा वस्तीत गेल्या १५ दिवसांपासून मलेरिया या आजाराने नागरिक बेजार झाले आहेत. या गावात आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नसून आरोग्य कर्मचारीही कधीच गावात येत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ग्रामसेवक तर गेल्या वर्षापासून गावात आलाच नाही. येथील लोकांना ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्याची व वाहनाची सोय नाही. आजारी रुग्णांना उपचारासाठी घेवून जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजही गावात धुरपताबाई शिवशंकर दुधभाते (४०), अर्चना शिवशंकर दुधभाते (१५), सविता नानासाहेब देशमुख (४०), नितीन नानासाहेब देशमुख (१२), खेडू माणिकराव देशमुख (४०), भाग्यश्री खेडेराव देशमुख (१५), शिला खंडेराव देशमुख (३५), राजश्री गोपाळ देशमुख (६), सुमनबाई शहाजीराव देशमुख (५०), मेघराज खंडेराव देशमुख (१३), आशा शिवशंकर दुधभाते (९), विष्णू शिवशंकर दुधभाते (८), पल्लवी गंगाधर दुधभाते (९), पूजा गंगाधर दुधभाते (१०), महेश गोपाळ देशमुख ९५), जनाबाई शहाजी चौधरी (४५), नंदा विश्वनाथ देशमुख (३५), नानासाहेब पांडुरंग देशमुख (४५), विद्या घुले (५५) यांना मलेरियाची लागण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
गावातील पथदिवेही पडले बंद
पावसाळ्यामुळे गावात केरकचरा व गवताचे प्रमाण वाढले असुन गावालगतच शेती आहे. त्यामुळे या गावात प्रत्येक दिवशी विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतीकडून याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवाळीला लावलेले पथदिवे खराब झाले. आता येणाऱ्या दिवाळीतच पथदिवे लावणार काय? असा गावकऱ्यांचा सवाल आहे. घर टॅक्स भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सक्ती केली जाते. या गावातून शंभर टक्के घर टॅक्स वसुल केल्या जातो. मग आमच्या समस्या सोडविण्याकडे का दुर्लक्ष केले जाते, असाही त्यांचा प्रश्न आहे.
रक्त तपासणी करून आरोग्य विभागाची चमू परतली
देशमुखगुड्यात आजाराचे थैमान, असे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, आरोग्य विभागाची चमू गावात पोहोचली. रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली. त्यात २० ते २२ जणांना मलेरिया आजाराने ग्रासले असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना गोळ्या देवून चमू परत गेली.
ब्लिचिंग पावडरचा वापरच नाही
पावसाळ्याच्या दिवसांत दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकावे लागते. मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे कमालिचे दुर्लक्ष केल्याने पिण्यायोग्य असलेले पाणीही दूषित झाले. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. आजुबाजूची घाण, केरकचरा यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ग्रामसेवकाशी दूरध्वनीवर संपर्क केला असता, ते म्हणाले, ब्लिचिंग पावडर आम्ही गावात पाठवितो. परंतु ते टाकत नसतील त्याला आम्ही काय करणार. आज पुन्हा मी आमच्या कर्मचाऱ्याला ब्लिचिंग पावडर घेवून पाठवित आहे, असे त्यांनी सांगितले.
सणावर आली संक्रांत
सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण आणि नागोबाजी पूजा केली जात असताना देशमुखगुडा गावात स्मशान शांतता होती. नागपंचमी सणही साजरा करता आला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितेल.
१९ आॅगस्ट रोजी देशमुखगुडा गावात भेट देऊन आजारी रुग्णांची रक्त तपासणी केली. तसेच मृत मुलीच्या वडिलांची भेट घेतली. सदर मुलीला आठ दिवसांपासून ताप येत होता. उपचारासाठी जवळच्या शेणगाव येथील खासगी दवाखान्यात नेले होते. मात्र तिच्यावर योग्य उपचार न झाल्याने ती दगावल्याचे समजते. आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळीच गाव भेटी केली असती तर ही घटना टळली असती. आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना सतत गाव भेटी करण्यासाठी पत्र दिले असुन आम्ही त्या गावात पुन्हा जाणार आहोत.
- डॉ. के.जी. कोरडे, आरोग्य अधिकारी, जिवती

Web Title: Citizens of Deshmukh, have turned their faces towards fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.