तपाळ योजना सात दिवसांपासून बंद

By Admin | Updated: June 21, 2016 00:40 IST2016-06-21T00:40:28+5:302016-06-21T00:40:28+5:30

नागभीडला पाणी पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना गेल्या सात दिवसांपासून बंद असल्यामुळे नागभीडकरांचे पाण्यासाठी चांगलेच हाल होत आहेत.

Check plan closes for seven days | तपाळ योजना सात दिवसांपासून बंद

तपाळ योजना सात दिवसांपासून बंद

पाण्यासाठी भटकंती : मिनरल वॉटरची मागणी वाढली
नागभीड : नागभीडला पाणी पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना गेल्या सात दिवसांपासून बंद असल्यामुळे नागभीडकरांचे पाण्यासाठी चांगलेच हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून अनेकांनी ‘मिनरल वॉटर’ ची खरेदी सुरू केली असून या पाण्याच्या विक्रीत गेल्या सात दिवसात बरीच वाढ झाली आहे.
तपाळ योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही योजना गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी तपाळ पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी युध्दस्तरावर प्रयत्न करीत असले तरी सातव्या दिवशीही त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे नागभीडकरांना सातव्या दिवशीही तपाळ योजनेचे पाणी मिळाले नाही.
नागभीड येथे अनेकांकडे पाण्याची खासगी व्यवस्था आहे. पण या व्यवस्थेचे पाणी पिण्यायोग्य नाही. आता यावर उपाय म्हणून अनेकांनी येथे कार्यरत असलेल्या खासगी मिनरल वॉटर शॉपमधून पाण्याची खरेदी सुरू केली आहे. नागभीड येथे तीन व नागभीड परिसरातील एका गावात हे मिनरल वॉटर तयार होत असून या चारही ठिकाणची पाण्याची विक्री गेल्या सात दिवसात बरीच वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)

सर्वत्र असंतोष
गेल्या सात दिवसांपासून तपाळ पाणी पुरवठा बंद असल्याने नागभीडकरांचे चांगलेच हाल सुरू आहेत. जे धनिक आहेत ते मिनरल वॉटर खरेदी करून आपली तहान भागवत आहेत. पण सामान्य लोकांचे काय, असा प्रश्न नागभीडमध्ये विचारला जात आहे. यावरून नागभीडमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. नागभीड नगर परिषदेने तपाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशीही मागणी होत आहे.

मागील सात दिवस नागभीडकरांना पाणी मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत. नागभीडकरांना स्थानिक पातळीवर पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, याचेही प्रयत्न सुरू आहेत.
- समीर माने, प्रशासक, नागभीड नगर परिषद तथा तहसीलदार

तपाळ पाणी पुरवठा योजनेत निर्माण झालेला दोष दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही सदर दोष दूर करण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात.
- मिलिंद चंद्रागडे, कार्यकारी अभियंता

तपाळ योजनेत निर्माण झालेला दोष दूर करण्यासाठी ७ दिवस लागतात. यावरून योजनेतील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता लक्षात येते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर किती वचक आहे हेसुद्धा आता दिसून आले.
- दिनेश गावंडे, माजी उपसभापती, नागभीड

Web Title: Check plan closes for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.