राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करताना मार्गदर्शन, मदत व्हावी यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक उल्हास नरड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
शिक्षणाधिकारी उल्हास नरड हे चंद्रपूर जिल्ह्याचे उपक्रमशील अधिकारी असून, शैक्षणिक क्षेत्राच्या कार्याबद्दल यापूर्वी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालडोह येथील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र परतेकी यांचीसुध्दा या गटात निवड करण्यात आली आहे. या गटाचे अध्यक्ष शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपाध्यक्ष एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, सदस्य सचिव विकास गरड आदींची निवड करण्यात आली आहे.
गटाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, प्रशासन गतिमान करणे, शैक्षणिक क्षेत्रात नवीन उपक्रम राबविणे, कोविड काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत कसे राहील, ग्रामीण भागातील विध्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकला पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा, ऑलिंपियाडमध्ये जगाच्या स्पर्धेत उतरला पाहिजे याकरिता शिक्षण विभागाला सूचना करण्यात येणार आहे.