वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणाऱ्या समितीत फेरबदल
By Admin | Updated: October 28, 2015 01:10 IST2015-10-28T01:10:56+5:302015-10-28T01:10:56+5:30
वरोरा वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांची नासाडी केल्यास वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते.

वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणाऱ्या समितीत फेरबदल
शेतकऱ्यांना दिलासा : स्थानिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
प्रवीण खिरटकर वरोरा
वरोरा वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांची नासाडी केल्यास वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. या समितीमध्ये तालुकास्तरावरील अधिकारी राहत असल्याने आर्थिक मदत मिळण्यास विलंब होत असे. मात्र आता या समितीत फेरबदल करण्यात आला असून या समितीमध्ये गावातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याने पंचनामे त्वरीत होवून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तातडीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वन्यप्राण्यापासून पिकांचे, फळबागांचे नुकसान झाल्यास शेतकरी नुकसान झाल्याबाबत कागदपत्र वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करीत असत. त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांची, फळबागाची पहाणी करण्यासाठी वनपाल, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, फलोत्पादन अधिकारी यांचा सहभाग असलेल्या समितीने १० दिवसांच्या आत घटनास्थळी पोहचून अहवाल तयार करण्याचे आदेश होते. या समितीमध्ये तालुकास्तरीय अधिकारी स्वत:च्या कार्यालयाच्या कामात अतिशय व्यस्त राहत असल्याने व समन्वयाच्या अभावाने पंचनामे होण्यास विलंब होत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना वनविभागाकडून कित्येक दिवस आर्थिक मदत मिळत नव्हती. आता वनरक्षक, कृषी सहाय्यक व तलाठी या तीन सदस्यांची समिती नुकतीच वनविभागाने नेमली आहे. सदर समिती नुकसानीची शहनिशा तसेच घटनास्थळी जावून पंचनामा करणार आहे.
सोबतच नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे आदी कार्यवाही करून तसा अहवाल १४ दिवसांच्या आत वनपरिक्षेत्र कार्यालयात सादर करणार आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयाने हा अहवाल चार दिवसांच्या आत उपवनसंरक्षक कार्यालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक यांनी आदेश काढल्यानंतर तीन दिवसांच्या आत किंवा तक्रार प्राप्त झाल्यापासून २६ दिवसांच्या आत आर्थिक मदत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. वनविभागाच्या या नव्या आदेशाने शेतकऱ्यांना वन्यप्राण्यानी केलेल्या पिकांच्या नासाडीची आर्थिक मदत मिळणे सुकर आहे.