कोविड रुग्णांच्या दुरुस्ती दरात चंद्रपूर जिल्हा सहाव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST2021-04-27T04:29:11+5:302021-04-27T04:29:11+5:30
चंद्रपूर : कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडली. त्यामध्ये वाढ करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे ...

कोविड रुग्णांच्या दुरुस्ती दरात चंद्रपूर जिल्हा सहाव्या स्थानी
चंद्रपूर : कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडली. त्यामध्ये वाढ करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. मात्र, नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या दुरुस्ती (रिकव्हरी रेट) दरात चंद्रपूर जिल्हा शेवटच्या स्थानी, तर मृत्युदर रोखण्यात दोन जिल्ह्यांपेक्षा पुढे असल्याची माहिती राज्य शासनाच्या कोविड-१९ डॅश बोर्डातून पुढे आली.
जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ८४०वर पोहोचली आहे. उपचारामुळे ठणठणीत होणाऱ्या रुग्णसंख्याही ३६ हजार ४१५ झाली आहे. सध्या १५ हजार ६३७ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आल्याने चाचण्यांचा वेग वाढला. परिणामी, आतापर्यंत तीन लाख ५७ हजार २६२ नमुन्यांची तपासणी करणे आरोग्य यंत्रणेला शक्य होऊ शकले. आतापर्यंत तपासलेल्या नमुन्यांपैकी दोन लाख ९८ हजार ४१८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. परंतु नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील पॉझिटिव्ह, अॅक्टिव्ह, निगेटिव्ह आणि कोरोना दुरुस्ती दराचा तुलनात्मक विचार केल्यास चंद्रपूर जिल्हा मागे असल्याचे आरोग्य विभागाच्या कोविड १९ डॅशबोर्ड अहवालातून दिसून येते.
नागपूरनंतर सर्वाधिक पॉझिटिव्ह चंद्रपुरात
२४ एप्रिलपर्यंत नागपूर जिल्ह्यात तीन लाख ७७ हजार ५००, वर्धा ३६ हजार ९१० व भंडारा ४४ हजार ०६१, तर चंद्रपूर जिल्ह्यात ५२ हजार ४२९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. नागपूर विभागातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. दरदिवशी सुमारे दीड हजार नवीन रुग्णांची भर पडत असल्याने सर्वांच्याच काळजात धडकी भरली आहे.
भंडारा जिल्ह्याने नेमके काय केले?
चंद्रपूर व भंडारातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत केवळ आठ हजार ३६८ रुग्णांचाच फरक आहे. मात्र, भंडाऱ्यातील रुग्णांचा दुरुस्ती दर तब्बल ९०.४ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्याचा ५८.३ टक्के आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा आरोग्य यंत्रणेने नेमके काय केले, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.
मृत्युतांडवातही एक दिलासा
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्याचा कोविड मृत्युदर प्रत्येकी १.३ टक्के आहे. या दोनही जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यातील मृत्युदर १.१ टक्के आहे. त्यामुळे मृत्युतांडव रोखण्यासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या आवाहनाला नागरिकांनीच आता गंभीरतेने प्रतिसाद देऊन सावध व्हावे लागणार आहे.