चंद्रपूृर-आष्टी रस्ता होणार चौपदरी राष्ट्रीय महामार्ग
By Admin | Updated: October 1, 2015 01:16 IST2015-10-01T01:16:56+5:302015-10-01T01:16:56+5:30
चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बल्लारपूर-बामणी- गोंडपिपरी-आष्टी या राज्य मार्गाला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे.

चंद्रपूृर-आष्टी रस्ता होणार चौपदरी राष्ट्रीय महामार्ग
मुनगंटीवारांच्या प्रयत्नाला यश : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची मान्यता
चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बल्लारपूर-बामणी- गोंडपिपरी-आष्टी या राज्य मार्गाला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.
केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १८ सप्टेंबर रोजी याबाबत कळविले आहे. नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा या भागात तात्काळ आणि प्रभावी दळणवळण सेवा पुरविता यावी यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यासोबतच चौपदरीकरण करण्याची मागणीही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडे सातत्याने रेटली होती. ८ आॅगस्ट २०१४ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून ना. मुनगंटीवार यांनी या संदर्भातील प्रस्ताव आणि फाईल त्यांच्याकडे सादर केली होती.
मागील अनेक वर्षांपासून ना. मुनगंटीवार ही मागणी मांडत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर शहरात झालेल्या जाहीर सभेत त्यांच्या मागणीवरून ना. गडकरी यांनी सदर रस्त्याला महामागार्चा दर्जा देत चौपदरीकरण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्या आश्वासनाची आठवण ठेवून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू ठेवला होता. मागील दीड महिन्यांपूर्वी चंद्रपूरच्या बांधकाम विभागानेही या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयालाला पाठिवला होता.
या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे चंद्रपूर-अहेरी हा प्रवासाचा वेळ कमी होणार असून नक्षलवाद कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा वाढली आहे. गडचिरोली जिल्हा आदिवसीबहूल व नक्षलग्रस्तही आहे. दळणवळणाची साधने अपुरी असल्याने उद्योगातही मागे आहे. या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रालासुध्दा प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात या क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने सदर रस्त्याला राष्ट्रीय महामागार्चा दर्जा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)