चंदनखेडा संसद आदर्श गावाला विकासाची आशा
By Admin | Updated: August 24, 2015 01:19 IST2015-08-24T01:19:11+5:302015-08-24T01:19:11+5:30
संसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णत: बहुमत दिले नसले ...

चंदनखेडा संसद आदर्श गावाला विकासाची आशा
चंदनखेडा : संसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णत: बहुमत दिले नसले तरी संमिश्र यश प्राप्त केलेल्या विविध पॅनलच्या नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्याकडून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ग्रा.पं. स्तरावरील विविध समस्या मार्गी लावतील, अशी ग्रामस्थांना आशा आहे. संबंधित पदाधिकारी या कसोटीत कसे खरे उतरतात? याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी युती, भाजप व अपक्षाच्या पॅनलला यश प्राप्त झाले. संसद आदर्श ग्राम असल्याने निवडणुकीपूर्वी अविरोध निवड व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु राजकीय पक्ष एकत्र न आल्याने सर्वांनीच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. नव्यानेच परिवर्तनवादी विचारसरणीचे पॅनल उतरल्याने राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक झाली.
निकालाअंती राष्ट्रवादी चार, कलदार पॅनलला चार, शिवसेना दोन व भाजपाला एक याप्रमाणे यश संपादन करता आले. यात सरपंचपदाची जागा अनु.जाती महिला राखीव असल्याने भाजपने सर्वस्व पणाला लावून ती बळकावली. याउलट विद्यमान सरपंचाच्या काँग्रेसला भोपळा मिळाला. सद्यस्थितीत कोणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने उपसरपंचपदाची चर्चा गावात जोमात सुरू असून राष्ट्रवादी सोबत कोण जाणार? की कलदार सोळआणे पॅनलला कुणाची मदत मिळणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून राजकीय पुढारी आपले मनसुबे आखत आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांपुढे विकासाची अनेक आव्हाने आहेत. जलस्वराज्य नळयोजनेचा प्रमुख उद्भवच असुरक्षित आहे. यात नदीच्या पात्रात विहीर असून ते पाणी साध्या पद्धतीने फिल्टर होण्याचे कुठलेही तंत्र न वापरल्याने जराही पाण्याचे शुद्धीकरण होत नाही. दूषित पाणी त्याच स्थितीत विहीरीत जाते व तेच पाणी नागरिकांना नळाद्वारे पिण्यास मिळत आहे. यासाठी नळ पाणी पुरवठ्यातील दोष, देखभाल व दुरुस्ती विषयी ठोस पाउल उचलणे गरजेचे आहे.
वैयक्तिक स्वच्छता , कौटुंबिक व सार्वजनिक स्वच्छतेसाठी १०० टक्के शौचालय बांधकाम व नियमित वापर याविषयी जागृती करणे गरजेचे आहे. सोबतच घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात दारुबंदी झाल्याने सुरुवातीला शांतता निर्माण झाली होती. परंतु सद्यस्थितीत पुन्हा एकदा दारूविक्रीला उधान आले असून चंदनखेडा संसद आदर्श ग्रामातील सामाजिक क्षेत्रातील मंडळी, तंटामुक्त गाव समिती व पोलीस यंत्रणा मौन बाळगून असल्याने दारूबंदी महिला समिती यावर प्रतिबंध करताना तोकडी ठरत आहे. दारूबंदी सोबतच मोठ्या प्रमाणातील वाद, अदखलपात्र गुन्हे याबाबत उपाययोजना तात्काळ व्हावी यासाठी पोलीस आऊट पोष्टची मागणी संबंधित विभागाकडे रेटून धरणे तितकेच गरजेचे आहे.
२००५ चे पूर्वीपासूनच जागेअभावी झुडपी जंगल नोंद असलेल्या शासकीय जागेवर अतिक्रमण करुन निवारासाठी वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे सदर कुटुंबाला शासनाच्या वनहक्क कायद्याअंतर्गत हक्काचा पट्टा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. वन हक्क पट्याचा प्रश्न निकाली काढणे हे मोठे आव्हान आहे. आरोग्य यंत्रणा व जनजागृतीचा अभावामुळे डेंग्यू आजाराने एका मुलाचा बळी गेला. प्रा.आ. केंद्रात स्थायी वैद्यकीय अधिकारी तसेच रिक्त असलेल्या जागा भरणे अतिशय आवश्यक आहे. (वार्ताहर)