विकत घ्यावे लागते पाणी !

By Admin | Updated: April 11, 2016 00:52 IST2016-04-11T00:52:26+5:302016-04-11T00:52:26+5:30

ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाटण ग्रामपंचायतमधील सितागुडा येथील कोलाम आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागते.

Buy water! | विकत घ्यावे लागते पाणी !

विकत घ्यावे लागते पाणी !

अनेक वर्षांपासून नळाचे पाणीच नाही : विहिरीतच नाही तर पोवऱ्यात कुठून येणार ?
शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवती
ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाटण ग्रामपंचायतमधील सितागुडा येथील कोलाम आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागते. अनेक वर्षांपासून येथे नळ योजना नाही. गावाजवळील विहिरीने तळ गाठला आहे. गावात एकच हातपंप आहे. त्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे. हातपंपाची पातळीही आता खालावली आहे. गावात कुठलेही कार्यक्रम असले की या आदिवासी कोलम बांधवांना पोटाला चिमटा घेऊन पाणी खरेदी करावे लागते. हे विदारक वास्तव लोकमतने आॅन दी स्पॉट भेट देऊन समोर आणले आहे.
पाटण तालुक्यातील सितागुडा कोलाम वस्तीची लोकसंख्या ३८० असून ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. संपूर्ण कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या गावात कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे येथील पाणी समस्या वर्षानुवर्षे तिव्र स्वरूप धारण करीत आहे. ग्रामपंचायतीच्या वेळकाढू धोरण पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहे. प्रशासक व ग्रामविकास्तार अधिकारी यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळेच ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. ग्रामस्थांना लग्न कार्य असो की कुठलाही कार्यक्रम. चक्क पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संबंधित अधिकारी यांच्या भोंगळ कारभारामुळे कोलाम बांधवांना अव्याच्या सव्वा भावाने पाणी खरेदी करावे लागत आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार जास्तीत जास्त ग्रामविकास अधिकारी जागेवरच बसून करीत असल्याचे गावकरी सांगत आहे.

ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना देणेघेणे नाही\
नऊ सदस्यीय संख्या असलेल्या पाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी हे नियमित ग्रामपंचायतीला येत नाहीत. आले तरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात कधी जात नाही. लोकांच्या समस्या कधी जाणून घेत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गाव अनेक वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडत आहे. मात्र ग्राम विस्तार अधिकारी मूग गिळून आहेत. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

विकासकामाला खीळ
आदिवासी कोलाम बांधवांच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र पाटण ग्रामपंचायतमधील जनकापूर (को), जनकापूर (कोलामगुडा), लच्छागुडा, पाटागुडा, सितागुडा या गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. काही लोकांचे घरकुलाचे काम सुरु आहे. मात्र अनेक जण अजूनही झोपडीतच जीवन कंठीत आहेत.

Web Title: Buy water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.