कोरपन्यात रस्त्यावरूनच पकडावी लागते बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:34+5:30
कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले नाही. भाजप व काँग्रेस सरकारच्या कालखंडात मोठ्या घोषणा झाल्या पण त्या हवेत विरल्या.

कोरपन्यात रस्त्यावरूनच पकडावी लागते बस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आणि तेलंगणा राज्याचा सीमावर्ती भाग लागून असलेल्या कोरपना येथे अद्याप बसस्थानकाची निर्मिती न झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुका निर्मितीला २७ वर्षे झाले. नेत्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र हवेत विरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले नाही. भाजप व काँग्रेस सरकारच्या कालखंडात मोठ्या घोषणा झाल्या पण त्या हवेत विरल्या. तालुका निर्मितीच्या २७ वर्षांनंतरही बसस्थानक नसल्याने प्रवाशांना चक्क रस्त्यावरील पानटपरी व हॉटेल समोर उभे राहून बस पकडावी लागत आहे. या तालुक्यात विकासाचा मोठा अनुशेष आहे. सामाजिक कल्याणाच्या योजना तालुक्यात पोहोचल्या नाही. कोरपना शहरात राज्य परिवहन महामंडळाकडून कमी बसेस सोडल्या जातात. त्यातच बसस्थानक नसल्याने संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने कोरपन्यात बसस्थानक उभारावे तसेच वरोरा, पांढरकवडा, उमरेड, गडचिरोली, वर्धा, अहेरी, ब्रह्मपुरी, जिवती, केरामेरी, असिफाबाद, भद्रावती, रामटेक आदी बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावर बसफेऱ्या वाढवा
घुग्घुस : चंद्र्रपूर- घुग्घुस- वणी मार्गावर कमी बसफेºया असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अजुनही सामान्य बसेसची संख्या वाढविली नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या वेळापत्रकानुसार चंद्र्रपूर-घुग्घुस मार्गावर अर्धा एक तासाने बस सोडण्याचा नियम आहे. मात्र या वेळापत्रकाचे कधीच पालन होत नाही, असा आरोप प्रवाशांनी केला. मागील आठ दहा महिन्यापूर्वी चंद्र्रपूर डेपोतून चंद्र्रपूर- घुग्घुस वणी आणि वणी डेपोतून वणी-घुग्घुस- चंद्र्रपूर जलद बसेस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरून घुग्घुस व वणी ये जा करणाºया प्रवाशांना सोय उपलब्ध झाली. पण, बहुतांश बसेस फुल्लं राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. यातून शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना सकाळी व सायंकाळी ताटकळत राहावे लागते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी चंद्र्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावर सामान्य बसेस वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.