जळणाऱ्या रोहित्रांवर राहणार नजर
By Admin | Updated: November 23, 2014 23:16 IST2014-11-23T23:16:46+5:302014-11-23T23:16:46+5:30
अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण

जळणाऱ्या रोहित्रांवर राहणार नजर
चंद्रपूर : अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण आता जळणाऱ्या रोहित्रांची झडती घेणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर परिमंडळात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या परिमंडळात २४ हजार रोहित्रे आहेत. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाही. विजेचा अनधिकृत वापर किंवा मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारीचा वापर झाल्यामुळे रोहित्रे जळतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अनधिकृत वापरावर वीज चोरीची कारवाई करावी, वीज चोरी थांबविल्याशिवाय रोहित्र देऊ नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
नागपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात १ हजार २९० रोहित्रांमध्ये बिघाड आला. रोहित्रात बिघाड आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. तक्रारींच्या आधारे एक हजार २६५ रोहित्रांची दुरुस्ती महावितरणतर्फे करण्यात आली. अजूनही काही रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम महावितरणतर्फे सुरू आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने आता महावितरणने जळणाऱ्या रोहित्रांची झडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अहवाल पाठविण्याचे निर्देशही क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. यात संबंधितांची जबाबदारी निश्चित करता यावी, यासाठी महावितरण मुख्यालयाने ज्या भागात रोहित्र जळाले आहे, ते गाव, विभाग, उपविभाग, उपविभागाचे प्रमुख आणि रोहित्राची जबाबदारी असलेल्या लाईनमनचे नाव याबाबतचा रोहित्र निहाय तपशील दररोज मुख्यालयात पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. या माहितीचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाणार आहे. महावितरणच्या नव्या निर्देशामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)