राजुऱ्याच्या सोनियानगरातील घरांवर चालला बुलडोजर!
By Admin | Updated: April 30, 2015 01:25 IST2015-04-30T01:25:11+5:302015-04-30T01:25:11+5:30
येथील नगर परिषदेच्या हद्दीमधील सोनिया नगर वॉर्डात मागील अनेक वर्षापासून झोपड्या बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुधवारी रखरखत्या उन्हात बुलडोजर चालला.

राजुऱ्याच्या सोनियानगरातील घरांवर चालला बुलडोजर!
राजुरा : येथील नगर परिषदेच्या हद्दीमधील सोनिया नगर वॉर्डात मागील अनेक वर्षापासून झोपड्या बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुधवारी रखरखत्या उन्हात बुलडोजर चालला. यावेळी अनेक गरीब, महिला, पुरुष, मुले अतिक्रम काढू नका, यासाठी विणवणी करीत होते. मात्र नगर परिषदेचा ताफा कुणाचेही ऐकायला तयार नव्हता. पोलीस यंत्रणाही जास्तीची तत्परता दाखविताना नागरिकांनी अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉर्डवासींना शिवीगाळ केल्याने प्रकाश खडसे नामक व्यक्तीने स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शेकडो सोनिया नगरचे नागरिक बेघर झाले आहेत. त्याच्या घरावर बुलडोजर चालताना, कष्टाने बांधलेला आशियाना उध्वस्त होताना उघळ्या डोळ्याने बघितला. मात्र शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण असताना त्यांना हात न लावता सोनियानगर मधीलच अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व महसूल आणि पोलीस अधिकारी तत्परतेने संसार उध्वस्त करताना दिसले. सोनियानगर येथील दलित नागरिक प्रकाश खडसे यांनी आधी सर्वे क्रमांक १४९ मधील अतिक्रमण हटवा नंतर आमची घरे पाडा, असे म्हणताच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे खडसे यांनी झोपड्या पाडू नका, असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्याला पोलिसांनी अटक केली. राजुरा शहराच्या शेवटच्या टोकावरील सोनिया नगरामध्ये गरीबाचे संसार उध्वस्त करण्याचा डाव सुरू होता. तेव्हा दोन नगरसेवक वगळता एकही नेता उपस्थित नव्हता. (शहर प्रतिनिधी)
शेकडो अतिक्रमणे केव्हा हटविणार ?
राजुरा शहरात सर्वे क्रमांक १४९ मध्ये शेकडो अतिक्रमण आहेत. लाखो रुपये घेऊन सरकारी जागा विकत घेण्याचा प्रकारही सुरू आहे. मग तेथील अतिक्रमण काढण्याची शासकीय अधिकाऱ्यांमध्ये धमक आहे काय, असा संतप्त प्रश्न सोनियानगरवासी करीत आहे.
कारवाई राजकीय द्वेषातून
नगर परिषद राजुराच्या सेवा केंद्र व बगीच्या बनविण्यासाठी येथील नागरिकांची बांधलेली घरे पाडण्यात आली. मग राजुरा शहरात करोडो खर्च करून बगीचे निर्माण करण्यात आले, ते नंतर नष्ट झाले. त्या जागेवरील अतिक्रमण का हटवत नाही. केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचे बोलल्या जात आहे.