ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करावी
By Admin | Updated: August 26, 2015 00:55 IST2015-08-26T00:55:33+5:302015-08-26T00:55:33+5:30
ब्रह्मपुरी या नव्या जिल्ह्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्रित असतापासूनची आहे.

ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करावी
विजय वडेट्टीवार यांची मागणी : मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर : ब्रह्मपुरी या नव्या जिल्ह्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्रित असतापासूनची आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यापूर्वी तत्कालिन सरकारने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा सुद्धा केलेली होती.
ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी फार जुनी असून येथील जनतेने वारंवार आंदोेलन, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, प्रधान सचिव महसूल यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.
आमदार विजय वडेट्टीवार निवेदनात म्हटले आहे, राज्यात नव्याने २२ जिल्ह्याची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करुन नवे जिल्हे निर्माण करणे हे जनतेच्या आणि प्रशासकीय सेवेच्या दृष्टीने सोेईचे आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी फार जुनी असून ब्रह्मपुरी जिल्हा घोषीत झाल्यास अनेकांच्या सोयीचे ठरणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली त्यापूर्वी तत्कालिन सरकारने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा सुद्धा केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली. चंद्रपूर जिल्हा मुख्यालय येथील नागरिकांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी नवा जिल्हा स्थापन झाल्यास सिंदेवाही, नागभीड, चिमूर, सावली, ब्रह्मपुरी येथील नागरिकांसाठी सोयीचे ठरणार आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)