युवकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:17+5:30
अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाताळा चौकात तिघांमध्ये पैशावरून वाद झाला.

युवकाची निर्घृण हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निलेश गोटे या युवकांवर तीन ते चार जणांनी चाकूने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादावरून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाताळा चौकात तिघांमध्ये पैशावरून वाद झाला. त्यानंतर निलेश गोटे आपल्या म्हाडा कॉलनी येथील घरी निघून गेला. आरोपी अंकित व शुभम हेदेखील म्हाडा कॉलनीकडे गेले. यावेळी त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. अशात म्हाडा कॉलनी येथे त्यांनी निलेश गोटे याच्या घरासमोरच निलेशवर चाकूने हल्ला केला. हल्ला होत असताना निलेशचे वडील घटनास्थळी आले. हल्लेखोरांनी निलेशच्या अंगावर व मानेवर चाकूने गंभीर घाव केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी निलेशने आपल्या वडिलांना हल्लेखोरांचे नाव सांगितले. वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर यांच्याविरुध्द भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी केली.
गुन्हेगारी वाढतेय
मागील दोन महिने लॉकडाऊन होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तगडा होता. रात्री नागरिक घराबाहेर पडत नव्हते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही सायंकाळी ५ वाजतानंतर जिल्ह्यात सर्वत्र शांतता पसरते. लॉकडाऊन शिथिल असल्यामुळे पोलिसांचाही फारसा बंदोबस्त नसतो. त्यामुळे रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.