सास्ती-गोवरी क्षेत्रात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
By Admin | Updated: December 31, 2016 02:14 IST2016-12-31T02:14:07+5:302016-12-31T02:14:07+5:30
राजुरा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सास्ती-गोवरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण असल्याने या क्षेत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सास्ती-गोवरी क्षेत्रात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
जि.प. निवडणूक : उमेदवारी मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा
गोवरी : राजुरा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सास्ती-गोवरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण असल्याने या क्षेत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कालपर्यंत या कार्यकर्त्यांना पक्षाचा काही लवलेशही नव्हता. ते कार्यकर्ते आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागायला लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी उमेदवारांची लांबलचक यादी पहायला मिळत आहे.
बहुतांश उमेदवार येथील स्थानिक रहिवासी असल्याने या क्षेत्राची निवडणूक चुरशीची होणार आहे. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली असून उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.
सास्ती-गोवरी जि.प. क्षेत्रात बहुतांश भाग हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात वेकोलि या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलिने परिसरात विकासकामे केली आहे. बहुतांश मतदार कोळसा खाणीत नोकरीवर असल्याने आर्थिक बाजू भक्कम आहे. परंतु नदी पड्यातील नागरिकांना अजूनही विकासकामांची आस लागली आहे. नदी पटयातील बहुतांश गावे आजही विकासापासून दूर असून गावात मूलभूत सोयी - सुविधांचा अभाव आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता जबाबदार असल्याचे आता नागरिकांकडून बोलले जात आहे. अक्षरश: ग्रामीण भागात विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी या भागाला मिळावा, अशी आशा नागरिक बाळगून आहे. येत्या काही दिवसात जि.प. निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या चाचपणीसाठी दिवसरात्र बैठका घेत आहे. कोणता उमेदवार पक्षासाठी सरस ठरेल, याचे राजकीय गणीत पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. उमदेवारांनी आता मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. कधीही मतदारांकडे ढूंकूनही न पाहणारे उमेदवार मतदारांच्या सुखदु:खात सहभागी होताना दिसत आहे.
सास्ती-गोवरी या क्षेत्राकडे सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. या क्षेत्रात भाजपातर्फे गोवरीचे विद्यमान सरपंच सुनिल उरकुडे, साखरीचे राजू घरोटे तर मधुकर नरड यांच्या नावाची चर्चा आहे. हे तीनही संभाव्य उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या गोटातील असल्याने हे पाहणे सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. काँग्रेसकडून राजुरा काँग्रेस कमेटीची उमेदवारी कुणाला मिळेल, याबाबत मोठी चवीने चर्चा केली जात आहे. तालुका अध्यक्ष दादा पाटील लांडे, उमाकांत धांडे, बापू धोटे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. या भागात उमाकांत धांडे यांचा चांगला जनसंपर्क आहे. तर दादा पाटील लांडे मुळचे गोवरीचे असल्याने त्यांचा गोतावळा मोठा आहे आणि बापू धोटे यांचे पक्षसंघटन मोठे असल्याने या तिनही उमेदवारांनी तिकीटासाठी मोर्चेबांधनी सुरु केली आहे.
शिवसेनेकडून विद्यमान जि.प. सभापती सरिता कुडे या उमेदवारांसाठी पुढे आल्या आहेत. तर याच पक्षाकडून विजयालक्ष्मी रोगे व बबन उरकुडे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. शेतकरी संघटनेकडून बाबा पाटील कावळे, कवडू पोटे यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी चांगलीच रंगत आहे. हे दोन्ही याच क्षेत्रातील मूळ रहिवासी आहे. भाजपा, सेना, संघटना व काँग्रेस पक्षाकडून ज्या संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येत आहे. ते बहुतेक उमेदवार कुणबी समाजातील आहे. त्यांचे नातेवसंबंध एकमेकांशी जुळले असल्याने उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींना चांगलाच घाम फूटणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही नवसे कार्यकर्तेही उमेदवारीसाठी पक्षाकडे चकरा मारत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात असली तरी सास्ती-गोवरी क्षेत्रातील संभाव्य उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच फिल्डींग लावली आहे. (वार्ताहर)