गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात सावळा गोंधळ
By Admin | Updated: May 8, 2014 01:54 IST2014-05-08T01:54:16+5:302014-05-08T01:54:16+5:30
गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा, चुकांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात सावळा गोंधळ
विद्यार्थी संभ्रमात : अभ्यासक्रमात संदर्भसूचीचा समावेश नाही
वरोरा : गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा, चुकांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सध्या गोंडवाना विद्यापीठाने नव्यानेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात संदर्भसूचिचा समावेश करण्यात आला नसल्याने गोंडवाना विद्यापीठाचा सावळा गोंधळ लक्षात येतो. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.
नव्यानेच स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात अनेक विषयात पदव्युत्तर परीक्षेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. संबंधित विषयाचा अभ्यासक्रम अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आला आहे.
तज्ज्ञाकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम गोंधळात टाकणारा असल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी विषयामध्ये एम.ए. भाग-१ ला एकूण दोन सेमीस्टरसह आठ पेपर्स देण्यात आले आहेत. प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थ्यांना १६गुणांचे प्रश्न बॅगराऊंड स्टडीजवर विचारले जातात. त्यामुळे आठही पेपर्समध्ये विद्यार्थ्यांना हा भाग अनिवार्य आहे. परंतु सदर टॉपीक कुठून मिळणार, याकरिता लागणारा संदर्भ ग्रंथ मात्र अभ्यासक्रमात देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. तसेच प्रथम सेमीस्टरमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले व त्यांनी दिलेल्या एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर तो पेपर पुन: देण्याची मुभा सर्वच विद्यापिठात आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठ याला अपवाद ठरले आहे. विद्यार्थी आपले परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरत असताना त्यात केवळ अनुत्तीर्ण विषयच भरता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांना नेट, सेट या पात्रता परीक्षेपासून वंचित रहावे लागणार असल्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना बेरोजगार रहावे लागणार असल्याने मानले जात आहे.
या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्याशी संपर्क साधला असता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा असली पाहिजे, हे मान्य करीत विद्यापीठ यावर विचार करीत असल्याची माहिती नाव प्रकाशित करू नये या अटीवर दिली. पदव्युत्तर विद्यार्थ्याचे नुकसान टाळावे याकरिता विद्यापीठाने सदर विषय गांभीर्याने घेणे आता गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)